पुण्यातील ध्वजारोहणाचा मान न मिळण्याबाबत स्पष्टच बोलले अजितदादा…
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्यात ध्वजारोहणाचा (Flag hoisting in Pune) मान न मिळाल्याबाबत माध्यमांमध्ये कालपासून उलटसुलट चर्चा होत आहेत. अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री होते आणि आजतागायत त्यांनी त्या ठिकाणी ध्वजारोहण केले आहे. मात्र यावर्षी हा मान राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना मिळाल्यामुळे अजितदादा नाराज झाले आहेत, अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आल्या. अजित पवारांनी मात्र यावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा पत्रकारांना अफवा पसरवण्याबाबत फटकारले आहे.
अजितदादा म्हणाले, पत्रकार मित्रांनो मी अनेक वर्षे पुणे शहराचा पालकमंत्री होतो. अनेक वर्षापासून १५ ऑगस्टचं झेंडा वंदन राज्यपालच करतात. इथे कधीही १५ ऑगस्टचं झेंडा वंदन पालकमंत्री करत नाहीत. पालकमंत्री १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं ध्वजारोहण करतात. २६ जानेवारीचं प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. ते मी केलं आहे, गिरीश बापट यांनीही केलं आहे, चंद्रकांतदादा पाटील यांनीही केलं आहे. पण लगेच आता या दादाला संधी नाही, त्या दादांना संधी नाही, हे काय चाललंय तुमचं? किती क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करता. हे ज्या चॅनलने दाखवलं त्यांनी आधी माहिती घ्यावी.
१५ ऑगस्टचं झेंडावंदन मंत्रालयाच्या समोर मुख्यमंत्री करतात. २६ जानेवारीचं मुंबईतील झेंडावंदन राज्यपाल करतात. ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. कुणाला कुठे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी द्यावी हा राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या मंत्र्यांना झेंडावंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण तुम्ही काही माहिती घेत नाही आणि उगाच रुसवेफुगवे सांगत बसता. यात कुणाचा रुसवा आणि कुणाचा फुगवा आहे? कुणी तुमच्याकडे रुसून सांगितलं, कुणी फुगून सांगितलं? काही बातमी नसताना उगाच लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा, अशा शब्दांत अजितदादांनी पत्रकारांना सुनावले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra