
मुंबई : भारतीय रिजर्व्ह वँकेकडून (आरबीआय) रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्याचा रेपा रेट ६.५० टक्क्यांवरच राहणार आहे, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर केले आहे. एमपीसीच्या बैठकीनंतर दास यांनी ही घोषणा केली. यामुळे कर्जदारांचे मासिक हप्ते जैसे थे राहणार असून, आर्थिक बोजा पडणार नाही.
दास म्हणाले की, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, रेपो रेट ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
कर्जदारांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. मात्र, या निर्णयामुळे बँकांकडून स्वस्त कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची निराशा झाली आहे.
आरबीआयचे लक्ष महागाई कमी करण्यावर असून, देशाची आर्थिक स्थिती मजबूत स्थितीत आहे. महागाईचा रेट आरबीआयच्या उद्दिष्टापेक्षा जास्त असला तरी ती कमी करण्यास आरबीआय कटीबद्ध असल्याचे दास यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी काळात महागाईचा दर वाढण्याची शक्यताही दास यांनी यावेळी व्यक्त केली.
२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर ५.४ टक्के असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हा दर गेल्या वेळी ५.१ टक्के इतका ठेवण्यात आला होता. अन्नधान्याची चलनवाढ हा चिंतेचा विषय असला तरी, महागाई नियंत्रणात भारतीय अर्थव्यवस्थेने लक्षणीय प्रगती केल्याचेही दास यांनी यावेळी सांगितले. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये किरकोळ महागाई दर ५.१ टक्क्यांवरून वाढून ५.४ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.