'या' मागण्या करणार पूर्ण
मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला बेस्ट कर्मचार्यांचा संप (Best Bus Strike) अखेर मागे घेण्यात आला आहे. डेपोमधून बेस्ट बस पाठवल्या न गेल्याने आठवडाभर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत मध्यरात्री बैठक झाली. या बैठकीत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर सर्व आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आझाद मैदानात (Azad Maidan) याबाबत घोषणा केली आहे.
काल मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी मध्यस्थी करत पुढील २४ ते ४८ तासांत हा प्रश्न सुटेल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार आता या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला असून कंत्राटी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला आहे.
मान्य करण्यात आलेल्या मागण्यांनुसार कामगारांचे पगार १५ हजारांवरुन १८ हजार करण्यात येणार आहेत. कामगारांच्या वार्षिक रजा भरपगारी करण्यात येणार असून त्यांना प्रवास मोफत दिला जाणार आहे. कामगारांना वार्षिक दिवाळी बोनस देण्यात येणार आहे, तसेच साप्ताहिक रजाही भरुन मिळणार आहे. कामगारांना वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी यावर कंपन्याना सूचना दिल्या जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे गेल्या सात दिवसांचा पगारही देण्यात येणार आहे.






