Wednesday, April 30, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

Ajit Pawar : शाहांनी कौतुक केलं तर तुम्हाला काय त्रास झाला? पत्रकारांवर पुन्हा उखडले अजितदादा...

Ajit Pawar : शाहांनी कौतुक केलं तर तुम्हाला काय त्रास झाला? पत्रकारांवर पुन्हा उखडले अजितदादा...

सरकारला पाठिंब्याचे कारणही केले स्पष्ट...

जेजुरी : काल पुणे येथे झालेल्या सहकार संस्थेच्या पोर्टल उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कौतुक केले. शिवाय अजितदादा आता योग्य जागेवर आहेत, मात्र इथे यायला थोडा उशीर केला असंही ते म्हणाले. यावर विरोधकांनी टीका केल्या. विरोधकांच्या टीकेला अजित पवारांनी तितकेच चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज जेजुरी येथे होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमापूर्वी माध्यमांशी बोलताना अजितदादांनी विरोधकांना चांगलेच सुनावले तसेच प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाही खडसावले.

अमित शाहांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जे कौतुक केलं त्यावर उबाठाच्या संजय राऊतांनी टीका केली. या टीकेबद्दल पत्रकारांनी अजितदादांचं मत विचारलं असता दादांनी त्यांना खडसावलं. ते पत्रकारांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला उद्योग नाहीत. यांनी कौतुक केलं तुम्हाला काय वाटतं? त्यांनी टीका केली तुम्हाला काय वाटतं? असं तुम्ही विचारता. माझं अमित शहांनी कौतुक केलं, तुम्हाला का वाईट वाटतं? माझ्यावर कोणी टीका केली मला काही वाटत नाही. आम्ही वडिलधाऱ्यांचा आदर करणारी माणसं आहोत.

पुढे अजितदादा म्हणाले, आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी, परिसराचा कायापालट करण्यासाठी, आपल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी, लोकप्रतिनिधींची कामे होण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. आज देशपातळीवर मला नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता दिसत नाही. माणसाच्या अनुभवातून वेगवेगळी मतं होऊ शकतात. रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांनी मोठा निधी दिला आहे, राज्याच्या विकासासाठी मी भाजपसोबत गेलो आहे, असंही अजित पवार म्हणाले.

मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही

देशात मोदींशिवाय मला दुसरा पर्याय दिसत नाही, राज्यातील महत्वाची काम आम्हाला करायची आहेत. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं आहे. अमित शाह यांना पुणे, नाशिक रेल्वेच आम्ही सांगितलं. त्यांनी सर्व कामं घेऊन दिल्लीला येण्याचं निमंत्रण दिलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.

साखर कारखान्यांच्या बाबतीत झाली आयुक्तांशी बैठक

अजित पवार म्हणाले, साखर कारखान्यांच्या बाबतीत २०, २२ वर्ष निर्णय होत नव्हते, तो निर्णय अमित शाह यांनी घेतला आहे. तसेच साखर कारखाना आयुक्तांशी एक महत्त्वाची बैठक पार पडल्याचंही ते म्हणाले. इथेनॉलचं उत्पादन प्रत्येक साखर कारखान्यात व्हावं, असं अमित शाह यांनी बोलून दाखवलं आहे. अमित शाह आणि आमची चर्चा वेगळीच झाली आहे, माध्यमात येणाऱ्या चर्चा चुकीच्या आहेत. आमच्यात विकास कामा संदर्भात चर्चा झाली आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment