- मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर
मोबाइलवर बाईपण भारी गं! या गाण्यावरचे रील बघता बघता त्यावरच्या उलटसुलट कमेंट्स वाचत होते. या चित्रपटानंतर बाईपण कसं श्रेष्ठ आहे, यावर सर्वत्र चर्चा होताना दिसते. आपण नेहमीच बाईवर, तिच्या समस्यांवर, तिने घेतलेले कष्ट व सोसलेला त्रास यावर वाचतो, बोलतो व ऐकत-पाहतही असतो. एकूणच आपल्या समाजात प्रत्येक गोष्टीत बाईला मधे आणून त्यावर सकारात्मक व नकारात्मक दोन्ही विचार मांडले जातात. पण पुरुषांवर आजवर फारसं कधी बोललंच गेलं नाहीये, हा विचार माझ्या डोक्यात आला, जेव्हा माझा भाऊ वैतागून म्हणाला, “काय कटकट आहे यार या दाढीची. रोज दाढी करा, मिशी वाढली, तर तिला ट्रिम करा… आणि हे केस? दर महिन्याला कटिंग करा, सेट करा… किती त्रास असतो आम्हा पुरुषांना!” मी त्याला म्हटलं, “आम्हा बायकांपेक्षा कमीच.” तर म्हणतो, “ताई, तुम्हा बायकांना काय कळणार आम्हा पुरुषांना काय काय सहन करावं लागतं ते? त्याच्यासाठी तुम्हाला पुरुषाचा जन्म घ्यावा लागेल.”
भावाच्या या वाक्यावर मी विचार करू लागले. खरंच आजवर स्त्रियांइतकं पुरुषांच्या गोष्टींना फारसं महत्त्वच दिलं गेलं नाहीये. त्यालाही वेदना होत असतील, त्यालाही काही सहन करावं लागत असेल, हे कोणाच्या गावीही नसतं. कारण पुरुष म्हणजे आक्रमकपणे सत्ता गाजवणारा, स्वतःचं वर्चस्व दाखवणारा अशीच प्रतिमा समाजाने आजवर दाखवली आहे व आपल्या संस्कृतीवर तशीच बिंबवली गेली आहे. पुरुषाची प्रतिमा हीच मुळी कणखर, बिनधास्त अशी चितारण्यात आली आहे. पुरुष हा कोणाला शरण न जाणारा, महत्त्वाचे निर्णय घेणारा, कुटुंबप्रमुख आणि म्हणून त्याच्या हातात सगळी सत्ता, व्यवहार अशी एक मानसिकता समाजात दिसते. पण अजूनही ती काहीशी गोंधळलेली अवस्था आहे. कारण आजच्या युगात पुरुष जर स्वतःचं वर्चस्व दाखवू लागला, तर म्हणतात, ‘अरे हा काय पुरुषपणा गाजवतोय? आजच्या जमान्यात असं चालणार आहे का?’ दुसरीकडे जर पुरुषाने शांतपणा, संयमीपणा दाखवला, तर तेही समाजाला चालत नाही. ‘नेभळटच आहे मेला!’ अशी खुद्द स्त्रियांकडूनच त्याची हेटाळणी केली जाते. बायकांचा विचार करणारा, त्यांचं म्हणणं ऐकणारा पुरुष असेल, तर म्हणतात, ‘बघा कसा बाईलवेडा झालाय!’
पुरुषाच्या डोळ्यांत पाणी आलेलं समाजाला चालत नाही. त्याने कायम अचल, कणखर, टणकच राहायला हवं अशी अपेक्षा असते. मात्र असं राहिलं तरी निगरगट्ट, पाषाणहृदयी, कठोर काळजाचा इ. इ. शिक्के त्याच्यावर मारले जातात. थोडक्यात, ‘इकडे बाई तिकडे खाई’ अशी गरीब बिच्चाऱ्या पुरुषांची अवस्था असते.
असं म्हणतात ना की, स्त्रीचे अश्रू दिसतात. पण पुरुषाला कितीही वेदना किंवा दुःख झालं तरी त्याला रडायला मनाई असते तेही खरंच आहे. माशाप्रमाणे त्याचे ते अश्रू पाण्यातल्या पाण्यातच विरून जातात. मग तो आतल्या आत रडतो. दुःख झालं तरी आत दाबून तो आपण स्थिर, कणखर असल्याचं भासवतो. पण वेदना त्यालाही होत असतीलच की, त्यालाही रडावसं वाटत असेलच की. मग हे स्वीकारणं इतकं का जड जातं? त्यालाही मोकळं होता आलं पाहिजे. घरातला कर्ता पुरुष न थकता रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी घाम गाळत असतो. कुटुंबासाठी सगळं काही करतो, पण त्याला गृहीत धरलं जातं. त्यालाही कधीतरी कौतुकाची थाप हवी असते, मायेचा हात पाठीवरून फिरायला हवा असतो, कुणाची तरी साथ हवी असते हे मात्र सारेच सोयीस्करपणे विसरतात.
पोषाखाचंही तेच. बाईने पॅण्ट शर्ट घातला, केस शॉर्ट केले, तर फॅशन पण पुरुषांनी केस वाढवले, जरा वेगळे कपडे घातले, तर तो अतरंगी आणि वेडा ठरवला जातो. स्त्रियांना कपड्यांचे वेगवेगळे चॉईस असतात, पण पुरुषांना एकच एक पॅण्ट आणि शर्ट – तेही ठरावीक रंगांचे. त्याचाही त्यांना कंटाळा येत असेल की, पण पुरुष हे सारं बोलणार तरी कसा आणि कोणापाशी?
लहानपणापासूनच त्याच्या मनावर हे संस्कार घातले जातात की, तू ही ही कामे करायची. तू असंच वागायचं, तरच तू श्रेष्ठ! मग तशीच कामं करून व तशाच विशिष्ट प्रकारे वागून स्वतःचं स्थान त्याला निर्माण करावं लागतं. पण प्रत्येक पुरुषाला हे सदा सर्वकाळ आवडेलच, असं नाही.
कलेच्या बाबतीतही फार वेगळी स्थिती नाही! काही कलाक्षेत्रात स्त्रीयांची जणू मक्तेदारी असते. उदाहरणार्थ, एखाद्या पुरुषाला नृत्याची आवड असली, तर समाज त्याला नावं ठेवतो. ‘नाच्या’ अशी त्याची हेटाळणी करतो. जणू काही नजाकत, सौंदर्य ही फक्त स्त्रियांचीच मक्तेदारी आहे.
मात्र आता हळूहळू या मानसिकतेत सकारात्मक बदलही होताना दिसतोय. वेगळ्या अर्थाने पुरुषही बोल्ड बनत आहेत. स्त्री आणि पुरुष ही दोन टोकं न राहता एका सुवर्णमध्य बिंदूच्या दिशेने उभयतांचा प्रवास कळत- नकळतपणे सुरू असल्याचं आपल्याला जाणवेल.
म्हणूनच ‘बाईपण भारी गं’ म्हणत असताना स्त्रीनेही पुरुषाचा संवेदनशीलतेने विचार केला पाहिजे. त्याचेही अश्रू झेलले पाहिजेत. त्याच्या चांगल्या कामाची नोंद घेऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे. तेव्हाच ‘पुरुषपण(ही) भारी रे’ हे सिद्ध होईल!
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra