Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीWomen Safety : राज्यात बेपत्ता झालेल्या ८० टक्के महिला सापडल्या

Women Safety : राज्यात बेपत्ता झालेल्या ८० टक्के महिला सापडल्या

गुन्हेगारीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आकडेवारी

मुंबई : राज्यात महिला सुरक्षा (Women safety) आणि कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा आज विधानसभेत (Legislative Assembly) विरोधकांकडून उचलून घरण्यात आला. याबाबत भाष्य करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्यात कमी झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात त्यांनी टक्केवारी जाहीर केली. तसेच राज्यात हरवणार्‍या महिलांपैकी ८० टक्के महिलांना परत आणण्यात यश येते, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सातत्याने समोर येणारा मुद्दा म्हणजे महिला गायब होणे. आपण जर एक गोष्ट पाहिली तर सर्वोच्च न्यायालयाने महिला आणि बालकं हे ज्यावेळेस गायब होतात त्यावेळेस आपल्यावर काही निर्बंध टाकले आहेत. उदाहरणादाखल ७२ तासांमध्ये आपल्याला त्याला एफ. आय. आर (FIR) मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. त्यांचं अपहरण झालंय किंवा त्यांना पळवण्यात आलंय असं समजून त्यांनी चौकशी करावी लागते. पण महिला आणि बालकं यांच्यावर होणार्‍या अत्याचारांत महाराष्ट्र हा देशात बाराव्या क्रमांकावर आहे. बाललैंगिक गुन्ह्यांच्या (child sexual offenses) संदर्भात महाराष्ट्र सतरावा आहे.

राज्यात गायब होणार्‍या महिलांमागे वेगवेगळी कारणे असतात. पण त्यांचं पुढे काय होतं याचा जर आपण विचार केला तर २०२१ साली अशी जी प्रकरणं झाली त्यात आतापर्यंत सापडलेल्या महिलांची संख्या ८७ टक्के आहे आणि ही कायम ९० टक्क्यांपर्यंत वाढत जाते. २०२२ मध्ये देखील हरवलेल्या ८० टक्के महिला सापडल्या आणि त्यांचीही संख्या ९० टक्क्यांच्या वर जाईल. तसेच २०२३ मध्ये जानेवारी ते मे या दरम्यान ज्या काही घटना घडल्या त्यातील ६३ टक्के घटना उघडकीस आल्या आहेत. हाही आकडा ९० टक्क्यांवर पोहोचेल.

पुढे ते असंही म्हणाले की, आपण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचत असलो तरी हे भूषणावह नाही जोपर्यंत आपण ९५-९६ टक्क्यांपर्यंत पोहोचत नाही. मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात परत येणार्‍या स्त्रियांचे प्रमाण हे १० टक्क्यांनी जास्त आहे. बालकांमध्येही ३४ हजारांपेक्षा जास्त बालकांना आपण त्यांच्या घरी पोहोचवले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सुरक्षित वाटणं अधिक महत्त्वाचं

अनेकदा आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार हा आकड्यांच्या आधारावर करतो. पण खरं तर सुरक्षित वाटणं अधिक महत्त्वाचं असतं.जर आपण मुंबईचा विचार केला तर वर्षानुवर्षे मुंबई ही इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत महिलांना सुरक्षित वाटते. महिला इथे रात्रीदेखील प्रवास करतात. हे वाटणं अधिक महत्त्वाचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सर्व गुन्ह्यांमध्ये यावर्षी घट

आपण आकड्यांचा विचार करताना लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राची लोकसंख्या ही देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळे प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे होणार्‍या गुन्ह्यांचा विचार केला तर महाराष्ट्रातील गुन्ह्यांचे प्रमाण एक लाखामागे २९४.३ आहे आणि त्यानुसार महाराष्ट्राचा क्रमांक हा देशात दहावा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या गुन्ह्यांमध्ये ५,४९३ इतकी घट आहे. खून, दरोडे, चोरी या सगळ्यातच घट आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -