तुमचं सरकार शासन आपल्या घरी तर आमचं सरकार शासन आपल्या दारी
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला. विधान परिषदेमध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आले. त्याचवेळी विधानसभेतही विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. आज आठवड्याच्या अंतिम प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोमणे मारत राज्य सरकारने केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. ते म्हणाले की, आमच्या सरकारने चांगलं काम केल्यानं विरोधक धास्तावले आहेत, गोंधळलेले आहेत. विरोधकांचा आत्मविश्वास डगमगलेला आहे.
राज्यातील उद्योगांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दाओसमध्ये जाऊन किती करार झाले हे मला माहीत नाही, ते सर्व गुलदस्त्यात आहे. मात्र श्वेतपत्रिका काढण्याच धाडस आमच्या उद्योग मंत्र्यांनी केलं, राज्यात १ लाख १८ हजार कोटीची परदेशी गुतंवणूक आली
अहंकारामुळे राज्याचे नुकसान होत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, आमचं सरकार हे परफॉर्मन्स करणारं सरकार आहे, २४ तास काम करणारं सरकार आहे. तुमचं सरकार हे शासन आपल्या घरी होतं. तर आमचं सरकार हे शासन आपल्या दारी सरकार आहे. फेसबुकवरुन घरात बसून लाईव्ह करणारे सरकार नाही.