Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीNitin Desai Suicide : नितीन देसाईंचा एनडी स्टुडिओ आणि कलाकारांच्या अविस्मरणीय आठवणी......

Nitin Desai Suicide : नितीन देसाईंचा एनडी स्टुडिओ आणि कलाकारांच्या अविस्मरणीय आठवणी… कशी होती देसाईंची कारकीर्द?

कर्जत : मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत कला दिग्दर्शनासाठी (Art direction) असलेलं मोठं नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai). त्यांनी आत्महत्या (Suicide) केल्याच्या खळबळजनक बातमीने अख्खी चित्रपटसृष्टी हादरली आहे. कर्जत येथील त्यांच्या एन. डी स्टुडिओमध्ये (ND studio) गळफास घेत वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी त्यांच्या जीवनात असलेल्या काही अडचणी समोर येत आहेत. या अडचणींची पडताळणी करुन शोध घेण्याचा पोलीस पूर्णपणे प्रयत्न करत आहेत.

मोठं स्वप्न सत्यात उतरवलं

नितीन देसाई या मराठी माणसाने अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. त्यांनी एक मोठं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलंही. २००५ मध्ये स्वतःच्या हिमतीवर त्यांनी कर्जत येथे ५२ एकरात भव्यदिव्य एनडी स्टुडिओ उभारला होता. कर्जत हे मुंबईपासून ६५ किमी अंतरावर आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हा स्टुडिओ बॉलिवूडच (Bollywood) नव्हे तर सर्वांचंच आवडतं शूटिंग डेस्टिनेशन बनला आहे. ५२ एकरात हा भव्य पसरलेला स्टुडिओ एखाद्या छोट्या शहरापेक्षा कमी नाही, ज्यात मोठे किल्ले, बाजारपेठ, मोठी हवेली, मंदिर, गाव अशी ठिकाणं तयार झाली आहेत.

‘हम दिल दे चुके सनम’ची ती हवेली ज्यात ऐश्वर्या रॉय रहायची ती हवेलीही याच स्टुडिओमध्ये बनवण्यात आली होती. इतकंच नाही तर आशुतोष गोवारीकर यांचा सुपरहिट ‘जोधा अकबर’ याच सेटवर शुट झाला. हृतिक रोशन-ऐश्वर्याच्या जोधा-अकबर चित्रपटातील अकबरचा किल्ला आणि राजवाडा देखील या स्टुडिओत बांधण्यात आला होता. आमिर खानच्या ‘मंगल पांडे- द रायझिंग’ या चित्रपटाचं पहिल्यांदा शूटिंग त्यानंतर मधुर भांडारकरचा ‘ट्रॅफिक सिग्नल’, वॉन्टेड, बॉडीगार्ड, प्रेम रतन धन पायो, किक या सलमान खानच्या प्रत्येक मोठ्या चित्रपटाचं शूटिंग येथे झाले आहे. ‘एवढं नाव, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरही हे टोकाचं पाऊल उचलण्याचं काय कारण असावं, यासंबंधी तपास सुरु आहे.

स्टुडिओच्या आठवणी कायम ताज्या

अनेक कलाकारांच्या आठवणी या स्टुडिओसोबत जोडल्या गेल्या होत्या. ‘जोधा अकबर’ हृतिक रोशन-ऐश्वर्या यांनी बराच वेळ घालवला होता. सलमान खानलाही कोणताही चित्रपट शुट करायचा असल्याचं तो हाच एनडी स्टुडिओची निवड करायचा. तर रेखा यांनी त्या स्टुडिओ एक छोटी खोली त्यांना द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा हेमा मालिनी या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा आल्या तेव्हा तिची भव्यता पाहून त्या थक्क झाल्या होत्या. नितीन चंद्रकांत देसाई या जगात नसले तरी त्याचा हा स्टुडिओ त्याच्या आठवणी कायम ताज्या ठेवेल यात काही शंकाच नाही.

नितीन देसाईंची भव्य कारकीर्द

‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. त्याचबरोबर बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, यासारख्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी सेट तयार केले होते. ‘राजा शिवछत्रपती’ या अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेल्या मराठी मालिकेची त्यांनी निर्मिती केली होती. २०११ मध्ये, त्यांनी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘हॅलो जय हिंद’ या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. पुढे ‘अजिंठा’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -