नवी दिल्ली : केंद्रीय कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत (Agricultural Infrastructure Fund Scheme) वर्ष २०२५-२६ पर्यंत होणा-या १ लाख कोटी रुपयांच्या वाटपापैकी ८ हजार ४६० कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम महाराष्ट्र राज्याला दिली असल्याही माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली.
या योजनेंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत स्मार्ट आणि अचूक कृषी पायाभूत सुविधा विकास प्रकल्प उभारले जाणार आहेत. ही योजना संपूर्ण भारतात २०२० मध्ये सुरू करण्यात आली असून, याद्वारे पात्र प्रकल्पांसाठी पात्र लाभार्थींना मध्यम ते दीर्घ मुदतीची कर्ज दिली जातात.
तसेच प्रधानमंत्री सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासाठी 2 हजार 265 कोटी 76 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वर्ष 2022-23 या कालावधीत महाराष्ट्रासाठी ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून 334 कोटी रुपये अर्थसाह्य करण्यात आले असून, ज्यामुळे 1 लाख 28 हजार हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आली असल्याचे श्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले. सन 2018-19 ते 2022-23 या कालावधीत महाराष्ट्रासाठी एका विशेष पॅकेजद्वारे 1 लाख 65 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.