Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीमहत्वाची बातमी

Samruddhi Mahamarga : आता समृद्धी महामार्गावरील अपघात होणार कमी; नागपूर विद्यापीठाने आणले इनोव्हेटिव्ह मॉडेल

Samruddhi Mahamarga : आता समृद्धी महामार्गावरील अपघात होणार कमी; नागपूर विद्यापीठाने आणले इनोव्हेटिव्ह मॉडेल

जाणून घ्या काय आहे हे मॉडेल... आणि कसे टप्पे असणार...

नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघातांची मालिका सुरुच आहे. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत असतात. या अपघातांमागे हायवे हिप्नोसिस (Highway Hypnosis) म्हणजेच संमोहन आणि सोबतच टायर फुटणे (Tire Burst) अशी कारणे समोर आली आहेत. या दोन प्रमुख कारणांवर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या (Nagpur University) भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय ढोबळे (Sanjay Dhobale) आणि संशोधक असणार्‍या प्रियल चौधरी (Priyal Choudhary) यांनी मिळून एक इनोव्हेटिव्ह मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलमुळे हायवे हिप्नोसिस आणि टायर फुटणे या घटना टळू शकतात अशी माहिती त्यांनी दिली आहे.

इनोव्हेटिव्ह मॉडेलमुळे समृद्धी महामार्गावर होणारे अनेक अपघात नियंत्रणात येऊ शकतात असा दावा संजय व प्रियल यांनी केला आहे. डॉ. संजय ढोबळे म्हणाले की, 'आम्ही समृद्धी महामार्गावर होणार्‍या अपघातांच्या अनेक कारणांचा शोध घेतला. त्यात टायर बर्स्ट होणे आणि वाहनचालकाचे संमोहन होणे ही दोन प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे हे टाळण्यासाठी आम्ही विचार केला आणि त्यातून इनोव्हेटिव्ह मॉडेल तयार केलं. समृद्धी महामार्गावर नागपूर ते मुंबई दीडशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर दर दोन किलोमीटरनंतर वाहनांची गती २० किलोमीटर प्रति तास कमी करत आणायची आणि एका विशिष्ट अंतरानंतर समृद्धी महामार्गावर अर्धा किलोमीटरचा पाण्याचा भाग तयार करायचा ज्यात अर्धा फूट पाणी असेल.

प्रियल चौधरी म्हणाल्या की, टप्प्याटप्प्याने दर दोन किलोमीटरनंतर वाहनांची गती कमी केल्यामुळे हायवे हिप्नोसिसचा (महामार्ग संमोहन) परिणाम होणार नाही. तर अर्धा किलोमीटरचा पाण्याच्या भागातून वाहन गेल्याने सिमेंट रस्त्यावर तीव्र गतीने चालल्यामुळे तापणाऱ्या टायर्सची योग्य कुलिंग होईल आणि टायर फुटणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. हे इनोव्हेटिव्ह मॉडेल लवकरच एमएसआरडीसीला सादर केले जाणार आहे.

कसे असणार मॉडेलचे टप्पे?

१. समृद्धी महामार्गावर १५० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर वाहनांची गती दर दोन किलोमीटरनंतर कमी करायची.

२. १५० किलोमीटरनंतर दर दोन किलोमीटर अंतरावर वाहनांची गती २०-२० किलोमीटर कमी करत आणायची.

३. वाहनांची गती दर दोन किलोमीटरनंतर २० किलोमीटर प्रति तास कमी केल्यामुळे हायवे हिप्नोसिस होणार नाही.

४. वाहनांची गती ४० किलोमीटर प्रति तास झाल्यानंतर महामार्गावर अर्धा किलोमीटर अंतराचा पाण्याचा टप्पा राहिल.

५. पाण्याच्या टप्प्यातून प्रवास करताना टायर्सची योग्य कुलिंग होईल आणि ते फुटणार नाही.

६. कुठे वाहनांची गती किती कमी करायची? कुठे पाण्याचा टप्पा आहे? हे वाहन चालकांना कळण्यासाठी योग्य साईन बोर्ड लावले जातील.

हायवे हिप्नोसिस म्हणजे काय?

हायवे हिप्नोसिस म्हणजेच महामार्ग संमोहन. हायवे हिप्नोसिस ही एक शारीरिक स्थिती आहे, यावेळी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते की, आपल्यासोबत काय घडतंय. हायवे हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर सुमारे अडीच तासांनी सुरु होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात. संमोहनाच्या स्थिती असल्यामुळे डोळ्यांनी जे पाहतो त्याचं मेंदू विश्लेषण करु शकत नाही. हायवे हिप्नोसिस हे अनेक वेळा अपघात होण्यामागचं पहिलं कारण मानलं जातं.

हायवे हिप्नोसिस हे लांब प्रवासादरम्यान मोकळ्या रस्त्यांवर घडते. वळण नसलेला रस्ता आणि वाहनांची वर्दळ नसलेल्या रस्त्यावर ही शक्यता जास्त असते. लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलतचित्र बघितल्यासारखं वाटतं आणि चालक फक्त समोर पाहत राहतो. त्याला आपल्या समोर काय घडतंय, हे चालकाला कळत नाही. वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहनांवर लक्षात ठेवणे आवश्यक आहे. शिवाय हायवे हिप्नोसिसपासून स्वतःला वाचवण्यासाठी, वाहन चालवताना दर दोन ते तीन तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. यामुळे तुमचं मन फ्रेश राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment