
नेमकं काय घडलं 'त्या' डब्यात... कसा झाला गोळीबार?
पालघर : आज पहाटे साडेपाचच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Firing) झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चेतन सिंह या आरपीएफ जवानाने (RPF Police) प्रवाशांशी झालेल्या बाचाबाचीतून गोळीबार केला. या घटनेत तीन प्रवासी व एका आरपीएफ जवानाचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी आता मृत व्यक्तींची नावे समोर आली असून मृत सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली याचाही जयपूर एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाने उलगडा केला आहे.
जयपूर एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये गोळीबार झाला. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहने गोळीबार केला. चेतनने या प्रवाशांना शोधून गोळ्या झाडल्याची शक्यता आहे. टिकाराम मीणा (एएसआय, आरपीएफ), अब्दुल कादर मोहम्मदहुसेन भानपुरावाला, रा. नालासोपारा, वय ५० वर्षे (प्रवासी), अख्तर अब्बास अली, रा. शिवडी. वय ४८ वर्षे (प्रवासी) अशी मृतांची नावं आहेत.
पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई) नीरज कुमार यांच्या माहितीनुसार सकाळी सहाच्या सुमारास एस्कॉर्टिंग ड्युटीवर तैनात असलेल्या एका आरपीएफ हवालदाराने गोळीबार केल्याचे त्यांना समजले. गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला, हे कळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क केला असून त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती नीरज कुमार यांनी दिली.
नेमकं काय घडलं 'त्या' डब्यात? प्रवाशाचा थरारक अनुभव!
जयपूर एक्सप्रेसमधील प्रवाशांपैकी एक असलेले एसी कोच अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला यांनी घटनेची अंगावर शहारे आणणारी माहिती सांगितली. ते म्हणाले की, पहाटे ५ च्या सुमारास बोगीत गोळीबाराचा आवाज झाला. मी एसी कोचच्या दिशेने गेलो. तेव्हा मृतदेह खाली पडले होते. पोलिस कॉन्स्टेबलच्या हातात पिस्तूल होते. तो डब्यात फिरत होता. एएसआय टिकाराम खाली पडले होते. त्याने अन्य ३ प्रवाशांवरही गोळीबार केला. मी लांबूनच हा सर्व प्रकार पाहिला. या घटनेमुळे सर्वच प्रवासी प्रचंड घाबरले होते.

गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर प्रवाशी प्रचंड घाबरले होते. ते गोंधळून गेले होते. त्यामुळे बोरिवलीजवळ रेल्वेचा वेग कमी होताच तकाही प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या. त्यात काही जण जखमी झाले. महिला प्रवाशांनी आपल्या मुलांसह सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
पोलिसांनी वेळीच त्याला पकडले
गोळीबारानंतर आरोपीने दहिसर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची चेन ओढली. त्यानंतर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या. ४ मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आलेत. आरोपीने मानसिक तणावातून हा गोळीबार केल्याची घटना आहे. बी-५ बोगीच्या काचेच्या दरवाजातून गोळी आरपार गेल्याची खूणही घटनास्थळी दिसून येत आहे. सद्यस्थितीत आरोपीची बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. हा गोळीबार त्याने का केला याचा पोलिस शोध घेत आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमीत ठाकूर यांनी दिली.