
एक फेसबुक पोस्ट आणि.... वाचा नेमकं काय घडलं?
कल्याण : एकीकडे राज्यात महिला सुरक्षेच्या प्रश्नाचे गांभीर्य वाढत चालले आहे तर दुसरीकडे एका रिक्षाचालकाने आपल्या तत्परतेने एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. रिक्षाचालक आणि जागरुक सामाजिक कार्यकर्ते म्हणून कल्याण परिसरात प्रसिद्ध असलेल्या मनोज वाघमारे या रिक्षाचालकाच्या तत्परतेने एका महिलेचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या तत्परतेला जिजाऊ संस्थेची अमूल्य मदत मिळाली.
गुरुवारी २७ जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान रिक्षाचालक वाघमारे यांनी फेसबुकला एक पोस्ट पहिली. त्या पोस्टमध्ये एक अनोळखी महिला दोन दिवसांपासून भर पावसात कल्याण येथील शितलादेवी मंदिराजवळ असलेल्या शेलार हॉस्पिटलच्या परिसरात भिजत असल्याचे सांगण्यात आले होते. तिचे काही विडीओ देखील पोस्ट करण्यात आले होते. ही पोस्ट पाहिल्यावर रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी जिजाऊ संस्थेच्या परिवारातील सदस्य असलेल्या रुपेश पाटील यांना याबाबत कळवले व स्वतः देखील तेथे जाऊन भर पावसात भिजत उपचारासाठी तळमळणाऱ्या त्या महिलेला रुपेश यांसह स्वत:च्या रिक्षात बसवून कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल पश्चिम येथे उपचारासाठी दाखल केले.
यावेळी महात्मा फुले पोलीस स्टेशनला सदर महिलेची माहिती देऊन रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना बोलावले असता त्या पोलीस स्थानकातून बराच कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर वाघमारे यांनी ११२ या मदत क्रमांकावर संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळेतच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले व खबर घेण्यात आली.
जिजाऊ संस्थेने तत्परतेने दखल घेतल्याने ही महिला वाचली आहे. जिजाऊ संस्थेसारख्या चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या सोबत प्रशासनाने आणि प्रत्येक नागरिकाने सहकार्याच्या भावनेने उभे राहिले पाहिजे असे वाघमारे यावेळी म्हणाले.