Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीVidhan Sabha : आधीच्या सरकारने वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी केला पोलिसांचा वापर...

Vidhan Sabha : आधीच्या सरकारने वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी केला पोलिसांचा वापर !

आमदार नितेश राणे यांचा विधानसभेत आरोप; कायदा व सुव्यवस्थेत आता खूप बदल

अडीच वर्षांपूर्वीच्या सरकारमध्ये पोलिसांचा वापर विरोधकांचे घर पाडण्यासाठी आणि केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उठवण्यासाठी केला जात होता. मात्र, या सरकारमध्ये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारली असून बेपत्ता मुलींचा शोध घेऊन पोलीस या मायबहिणींना सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहचवतील, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

मुंबई : अडीच वर्षांपूर्वीच्या सरकारमध्ये राज्यातील पोलिसांना घरगड्याप्रमाणे वागवले जात होते. आपले वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात होता. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहखात्याचा कारभार हाती घेतल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत खूप बदल झाले असून पोलिसांचे मनोधैर्य आणि विश्वासार्हता वाढली असल्याची अभ्यासपूर्ण माहिती भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधानसभेत (Vidhan Sabha) अल्पकालीन चर्चेत बोलताना दिली.

नितेश राणे म्हणाले की, शिंदे-भाजप सरकार आल्यापासून राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेत खूप बदल झाले आहेत. पोलिसांविषयी जनतेच्या मनात विश्वासार्हता वाढली आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण ५५.३६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यावर जनतेला न्याय मिळण्याचे प्रमाण वाढले. अमली पदार्थ तस्करी, फॉरेन्सिक लॅब, महिला व बालकांवरील अत्याचार अशा सर्वच गुन्ह्यांमध्ये पोलिसांची कार्यक्षमता वाढली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दहशतवादविरोधी पथकाला(एटीएस) दिले आहेत.

अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर असलेल्या सरकारमध्ये पोलिसांना अगदी घरगड्यासारखे वागविले जात होते. आपले वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात होता. राज्यातील जनतेने त्याचा अनुभव घेतलेला आहे. आता महिला अत्याचाराच्या विषयावर बोलणाऱ्यांच्या डोक्यात ही गोष्ट आली नव्हती, असे नितेश राणे म्हणाले. मणिपूरची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. दोषींवर कारवाई सुद्धा सुरू झाली आहे. मात्र, केवळ राजकारण करण्यासाठी मणिपूर घटनेचा वापर केला जात असल्याचा आरोप राणे यांनी केला.

राजस्थानच्या जोधपूरमध्ये सहा महिन्यांच्या मुलासह २ महिलांना जिवंत जाळण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये पंचायत समिती निवडणुकीत लोकांना जिवंत जाळून त्यांची घरे जाळण्यात आली. बिहारमध्ये तशीच परिस्थिती आहे. मात्र, या राज्यांमध्ये सरकार वेगळे आहे म्हणून कोणी बोलत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेपत्ता मुलींवर बोलणाऱ्यांनी मुंबईतील दिशा सालियन या मुलीच्या मृत्यूविषयी देखील बोलले पाहिजे. दिशा सालियनचा पोस्टमार्टेम रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज कुठे गायब झाले? याबद्दल बोलण्याची गरज आहे. त्यावेळी कायद्याची कुऱ्हाड का चालली नाही, पोलिसांवर कोणाचा धाक होता? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. डॉ. स्वप्ना पाटकर या महिलेला अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली. त्यावेळी स्वप्ना पाटकर कायद्याच्या चौकटीत बसत नाही काय? असे विचारून नुसत्या राजकारणासाठी या गोष्टी करण्यात आल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला.

लव्ह जिहाद, धर्मांतर हे राजकीय विषय नाही, त्याकडे सामाजिक विषय म्हणून बघितले पाहिजे. मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाचा सामान्य जनतेला त्रास होतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने भोंग्यांविरुद्ध कारवाई सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुंबईत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी व रोहिंग्ये घुसखोर राहतात, आपल्या देशात फ्रान्स, युरोपसारखी स्थिती निर्माण होण्याआधी या घुसखोरांना हाकलून लावण्याची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -