डोंगराला तडे जाऊन भेगा पडायला सुरुवात
पेण: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरसाळवाडीची घटना घडल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप हद्दीतील बारीवाडी या आदिवासी वाडीला लागून असलेल्या डोंगराला तडे जावून मोठ मोठ्या भेगा पडायला सुरुवात झाली आहे. बारीवाडीला दरड व भूस्खलनाचा धोका असल्याने तहसीलदार स्वप्निल डोईफोडे यांनी तातडीने १५० नागरिकांना स्थलांतरित केले आहे. दरम्यान, ७० घरे असलेली बारीवाडी एका तासात खाली करायला सांगितल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी.बी.पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील, सरपंच सुनील पाटील, हनुमान पाटील, संजू पाटील, स्वप्नील पाटील, विशाल गावंड तसेच ग्रामसेवक तानाजी मेकाले, तलाठी शिवाजी वाभले यांनी सर्व नागरिकांना गणपती वाडी येथील मराठा समाज भवनात तात्पुरते स्थलांतरित केले आहे.