एकदा सदाशिव रंगनाथ वानवळे नावाचे एक गृहस्थ दुसऱ्या एका व्यक्तीला सोबत घेऊन शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता येऊन पोहोचले. या सदाशिवांचे टोपणनाव तात्या असे होते. ज्यावेळी वानवळे शेगाव येथे मठामध्ये पोहोचले, त्यावेळी श्री गजानन महाराज जेवायला बसले होते. वानवळे यांना पाहताक्षणीच महाराज मोठ्याने म्हणाले, “अरे या नाथाच्या शिष्याला माझ्यासमोर आणून बसवा. त्यांचे गुरू माधवनाथ महाराज हे आत्ताच माझ्यासमवेत जेवून गेले, तो हे इथे आले. त्यांचे गुरू विडा न घेताच निघून गेले. हे जर थोडे आधी आले असते, तर इथेच यांची भेट त्यांच्या गुरूंसोबत झाली असती.” असे म्हणून महाराजांनी वानवळे यांना आपल्या बंधूची पोरे म्हणून प्रेमभराने आलिंगन दिले. रितीप्रमाणे मठामध्ये वानवळ्यांचा सत्कार करण्यात आला. (आजतागायत श्री गजानन महाराज संस्थान येथे येणाऱ्या भक्तमंडळी, माता भगिनी तसेच, वारकरी, सेवेकरी मंडळींचा सत्कार करण्यात येतो).
वानवळे जेव्हा परत जाण्याकरिता निघाले, तेव्हा महाराज त्यांना म्हणाले,
तुम्ही माधव नाथाला।
असेच जा भेटण्याला।
त्यांचा येथे राहिला।
विडा तो त्या द्यायास ॥ ३४॥
मी म्हणतो तेच सांगा।
पदरचे न घाला बघा।
आमच्या वाक्या माजी उगा।
फरक तुम्ही करू नये ॥ ३५॥
म्हणा “साथ हे भोजन हुआ ।
विडा तुम्हारा यही रहा।
तो आम्ही आणिला पहा।
नाथा तुम्हा द्यावयास” ॥ ३६॥
हे सर्व बोलणे वानवळे यांनी ऐकले आणि महाराजांनी दिलेली दोन विड्याची पाने घेऊन तिथून निघाले. सर्व हकिकत त्यांनी माधवनाथ महाराजांना सांगितली आणि विचारते झाले की महाराज आपण त्या दिवशी शेगावला आला होता का? त्यावर माधवनाथ महाराज म्हणाले,
गजानन जे बोलले।
तसेच आहे जाहले।
भोजन समयी त्यांनी केले ।
स्मरण माझे तीच भेट” ॥३९॥
“अशा पद्धतीने आम्ही सदैव एकमेकांना भेटत असतो. येथे शंका घेऊ नका. स्मरण हीच भेट आहे. अरे आमचे शरीर जरी वेगवेगळे असले तरी प्राण मात्र एकच आहे. हे अत्यंत खोल ज्ञान आहे. ते तुम्हाला इतक्यात कळणार नाही.” बरे झाले, तुम्ही आमचा राहिलेला विडा शेगाव येथून आणला. वानवळ्यांनी दिलेली विड्याची पाने माधवनाथ महाराजांनी खलबत्त्यात टाकून कुटली व भक्षण केली तसेच थोडा प्रसाद वानवळे यांना दिला. हा प्रसंग सांगत असताना दासगणू महाराजांनी चांगदेव पासष्टी मधील दाखला दिला आहे ते म्हणतात,
योगी वाटेल तेथोनी।
भेटे एकमेकांलागूनी।
भेट ठाईच बैसोनी।
होते त्यांचे कौतुक हे ॥ ४६॥
या सोबतच महाराज सांगतात, एकदा देहू येथे श्री तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू असताना कीर्तन मंडपात आग लागली, ती शेख महंमद यांनी श्रीगोंद्यात बसून विझवली. असे अनेक दाखले दासगणू महाराजांनी दिले आहेत. पुढे दासगणू महाराजांनी योगाचे महत्त्व सांगितले आहे. महाराज म्हणतात,
खरा योगी असल्याविना।
ऐसे कौतुक होईना।
हे न साधे दंभिकांना।
त्यांनी गप्पाच माराव्या ॥ १५०॥
योग अवघ्यात बलवत्तर।
त्याची न ये कोणा सर।
करणे असल्या राष्ट्रोद्धार।
त्याचा अवलंब करा हो ॥ ५९॥
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…