
पाच वर्षांपासून पाठपूरावा करुनही होतेय दुर्लक्ष
दापोलीतील सोवेली धरणाला गळती, नागरिकांमध्ये घबराट, प्रशासनाकडून पाहणी, दक्ष राहण्याच्या सूचना
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दापोली तालुक्यात दाभोळ भंडारवाडा येथील हनुमान मंदिराची भिंत कोसळून मंदिराला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे दापोलीतील सोवेली धरणाला गेल्या पाच वर्षापासून लागलेली गळती यावर्षी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. प्रशासनाच्या वतीने स्थानिक अधिका-यांनी धरणाची पाहणी केली. या पावसात सर्वजण हतबल असून नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
गळती लागल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सोवेली धरणाची पाहणी केली. या पाहणीत धरणाच्या भिंतीच्या मध्यभागी आणि पायाजवळ पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील ग्रामस्थांनी मागिल ५ वर्षांपासून गळती होत असून त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही, मात्र पावसाळ्यात येथे धोका निर्माण होऊ शकतो ही गंभीर बाब दापोली प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे.
दरम्यान, या पाहणीनंतर प्रांताधिकारी डॉक्टर थोरबोले यांनी संबंधित विभागाला तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. धरणाच्या खालील बाजूला असणा-या लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हे धरण ज्यांच्या अधिपत्याखाली येते त्या लघुपाटबंधारे विभागाला प्रांताधिकार्यांनी लेखी पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी कळवले आहे.
मात्र पावसाचा जोर कायम असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागिल पाच वर्षापासून पाठपूरावा करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने सरकार धरण फुटण्याचीच वाट पहातेय का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.