
उद्धव ठाकरेंच्या काळातील मुंबई मनपातील घोटाळ्यावरून फडणवीसांची टीका
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या सरकारने जाणीवपूर्वक अंधत्व पत्करले होते आणि मुंबई महापालिका ही त्या काळात भ्रष्टाचाराचे कुरण झाली होती, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना तीन कोटींचा भूखंड साडेतीनशे कोटींना गेल्याचे प्रकरण घडले आहे का? असे विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगच्या अहवालाचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. हे कॅगच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही केवळ झाँकी आहे, असे अनेक घोटाळे बाकी आहेत. असे म्हणत ठाकरेंच्या काळात 'आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय' अशी परिस्थिती होती, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कॅगच्या अहवालात हे उघडकीस आले आहे की, तीन कोटींचा प्लॉट साडेतीनशे कोटींना देण्यात आला. त्यावरही समाधान न झाल्याने अधिकचे पैसे मिळावेत म्हणून संबंधित लोक कोर्टात गेले आहेत. आपल्याला एक म्हण माहित आहे ती काय तर 'आंधळा दळतो आणि कुत्रं पीठ खातं' या म्हणीप्रमाणे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अंधत्व पत्करुन कशाप्रकारे अनेकांना पीठ खायला दिले जात होते हे यातून स्पष्ट होते. देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मुंबई महापालिकेतल्या मविआ काळातल्या भ्रष्टाचाराविषयी विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.