छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा क्रांती मोर्चाची (Maratha Kranti Morcha) सुरुवात ९ ऑगस्ट २०१६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथून झाली होती. आता त्याच छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाड्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करीत पुन्हा एकदा ९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्राचा निर्णय न घेतल्यास सर्वच राजकीय पक्ष आरक्षणविरोधी असल्याची जनजागृती मराठा विद्यार्थी मोर्चा गावोगावी जाऊन करणार असल्याचेही यावेळी ठरविण्यात आले. याविषयीचा निर्णय मराठा आरक्षण विद्यार्थी जनआंदोलन समितीच्या बैठक घेण्यात आला आहे.
म्हाडा कॉलनी येथील जिजाऊ मंदिर येथे मराठा विद्यार्थी मोर्चातर्फे रविवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मराठा आरक्षण हे न्यायालयात अडकले नसून, राजकीय इच्छाशक्तीमुळे अडकले आहे. मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात मराठा समाज हा कुणबी म्हणून गणला जातो. मराठा व कुणबी एकच असल्याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. गायकवाड आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध केले आहे. त्यामुळे आरक्षण देण्याची कृती ही राज्य शासनाचे असते. मात्र, शासनाने आतापर्यंत मराठा समाजाला गृहीत धरले आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आरक्षणाचा प्रश्नच कायमस्वरुपी निकाली निघतो, अशी मांडणी विविध तज्ज्ञांनी आकडेवारीसह केली. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य डॉ. राजेश करपे, सांख्यकिय तज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. विलास खंदारे, डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. ललित अधाने, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गितांजली बोराडे, ॲड. आकाश गाढे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
९ ऑगस्टच्या क्रांती मोर्चात विद्यार्थी केंद्रस्थानी असणार आहेत. त्याचवेळी विद्यार्थ्यांचे पालक म्हणून समाजातील मान्यवर पाठीशी राहतील, असेही यावेळी ठरविण्यात आले. या बैठकीला ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, डॉ. राम चव्हाण, डॉ. भास्कर साठे, डॉ. कृतिका खंदारे यांच्यासह समाजातील प्राध्यापक, वकील, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra