Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : शरद पवारांनी न केलेलं 'ते' वक्तव्य देवेंद्र फडणवीसांमुळे पुन्हा...

Devendra Fadnavis : शरद पवारांनी न केलेलं ‘ते’ वक्तव्य देवेंद्र फडणवीसांमुळे पुन्हा चर्चेत

राहुल गांधींवरही निशाणा साधला

गंगापूर : गंगापूर तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या १०७५ कोटी रुपयांच्या ‘हर घर नल’ योजनेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गंगापूर शहरात आले होते. गंगापूर तालुक्यातील २०९ गावांसह त्या गावांमधील वाड्या, वस्त्यांवर डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत प्रत्येक घरात नळ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या एका वक्तव्याचा उल्लेख केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी ‘मी संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार’ असं वक्तव्य केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. त्यामुळे या विधानावरील चर्चा बंद झाली होती. मात्र, आज छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूरमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्या वक्तव्याचा उल्लेख करत शरद पवारांवर टीका केली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर केले होते. यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने त्याचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे केले. यावेळी छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं नाव होणं तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न फडणवीसांनी मोदी @९ या कार्यक्रमात उपस्थित लोकांना विचारला. यावर हो असं उत्तर येताच फडणवीस म्हणाले, “छत्रपती संभाजी नगर हे नाव शरद पवारांना मान्य नाही. ते म्हणाले तुम्ही नाव काहीही करा मी औरंगाबादच म्हणणार. पवारसाहेब तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलंत तरीही छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कुणीही काढू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर हल्ला चढवला.

राहुल गांधी परदेशात देशाची बदनामी करतात

भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. कोरोना लस तयार करणे भारतासाठी मोठे यश आहे. लस घेण्यासाठी भारतीय नागरिकांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिले आहे, असं ते म्हणाले. याचबरोबर महाराष्ट्रात सध्या चार लाख कोटींची कामे सुरू असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
याच वेळेस फडणवीसांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत. त्यांना अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनेच प्रत्युत्तर दिले आहे. अशी फडणवीसांनी टीका केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -