
सुंदर फुलांची आरास, दिवे, माळा यासह मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज
मुंबई : आज आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. पंढरपुरात वारकर्यांची मंदिराबाहेर तोबा गर्दी उसळली आहे. ज्यांना पंढरपुरात जाणे शक्य नाही असे लोकदेखील महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेत आहेत. त्यातच आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) मुंबईतील वडाळा येथील प्रतिपंढरपूर (Wadala Pratipandharpur) समजल्या जाणार्या विठ्ठल मंदिरात विठूमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे.
आज सकाळी वडाळ्याच्या प्रतिपंढरपुरात महापूजा पार पडली आणि तेव्हापासून लांबच्या लांब रांगा लावून भाविक दर्शनासाठी सकाळपासूनच या ठिकाणी आले आहेत. या विठ्ठल मंदिरातील प्रमुख गाभार्याला फुलांची सजावट करण्यात आली असून विठ्ठल-रखुमाईला विविध आभूषणांनी सजवण्यात आले आहे. सुंदर फुलांची आरास, दिवे, माळा यासह मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज करण्यात आले आहे. इथे भजन म्हणणार्या मंडळींमुळे तसेच भाविकांच्या उत्साहामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय व मंगमलमय झाले आहे.
मंदिर प्रशासनाकडून येणार्या भाविकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणाले की,'मुंबईतील लोक वडाळ्यातील प्रतिपंढरपूरला येतात, याचं कारण असं की कामामुळे ते पंढरपूरला जाऊ शकत नाहीत. ४०० वर्षांपूर्वी पांडुरंगाची मूर्ती तुकाराम महाराजांनी स्वतः या ठिकाणी स्थापन केली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकांच्या मनात या ठिकाणाबद्दल श्रद्धा आणि विश्वास बसलेला आहे, म्हणून ते नेहमीप्रमाणे इथे येतात'.
काय आहे वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामागचा इतिहास ?
हे विठ्ठल मंदिर ४०० वर्षांपूर्वीचे असून पूर्वी वडाळा मिठागरांसाठी ओळखले जायचे. इथे राहाणारे बहुतेक व्यापारी मिठाचा व्यापार करायचे. एक दिवस काम करताना या मिठागरात त्यांना विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी ही गोष्ट पंढरपूरला जाऊन तुकाराम महाराजांना सांगितली. तेव्हा महाराजांनी या मूर्तीची त्याच जागी स्थापना करण्यास सांगितले. तेव्हा येथील व्यापाऱ्यांनी विठ्ठल आणि रखुमाईच्या मंदिराची स्थापना केली, अशी यामागची कहाणी आहे.