
कोयता हल्ला प्रकरणी तीन पोलीस कर्मचार्यांच्या निलंबनासोबतच आणखी काही महत्त्वाचे निर्णय
पुणे : शांत, सुसंस्कृत आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून सध्या एकापेक्षा एक विकृत, क्रूर अशा गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. दर्शना पवार हत्या प्रकरण (Darshana Pawar), एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने केलेला वार, पुण्यातील कोयता गँगची (Koyta gang) दहशत यामुळे संपूर्ण पुणे हादरलं आहे. पुण्यात शिक्षणासाठी मुलांना पाठवायचे की नाही याबाबत पालकवर्ग चिंताग्रस्त आहे. पुणे सुरक्षेच्या बाबतीत उणे आहे, असा ठपका लगावला जात आहे. त्याचबरोबर पुणे पोलीस (Pune Police) नक्की करतायत काय? गुन्हेगारांना पोलिसांचा वचक आहे की नाही असे सवाल उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
पुणे पोलीस प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील बाबी करण्यात येणार आहेत -
१. पुणे महिला पोलिसांची २५ दामिनी पथकं तयार करण्यात येतील, त्यामुळे दामीनी पथकांचा आकडा ४० वर जाणार आहे.
२. बीट मार्शलमध्ये नव्या १०० जणांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण २०० बीट मार्शलद्वारे पुण्यात पेट्रोलिंग होणार आहे.
३. पोलिसांकडून शहरातील महाविद्यालयांमध्ये समुपदेशन कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
४. पुण्यातील प्रत्येक पोलीस चौकी २४ तास सुरु राहणार आहे.
पुण्यातील कोयता हल्ला प्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित
पुण्यातील सदाशिव पेठेत कोयता हल्ल्याच्या वेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरुगेट पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थितीत नव्हता. तसंच बीट मार्शल यांनी देखील घटनास्थळी यायला २० मिनिटं लावली. त्यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवले जात असतानाच विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलीस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
तरुणवर्गाचं म्हणणं काय?
दरम्यान, 'प्रेम करताय तर नकार पचवण्याची ताकद असली पाहिजे', 'अधिकारी मुलींच्या बाबतीत हे तर सर्वसामान्य मुलींचं काय?' अशा प्रतिक्रिया तरुणवर्गातून उमटत आहेत.