
भारतात होणा-या भारत-पाकिस्तान सामन्याविरुद्ध संदीप देशपांडेंची खोचक टीका
मुंबई : यंदा भारताकडे यजमानपद असलेला क्रिकेट वर्ल्डकपचा (Crickert World cup) सामना ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे. विशेष बाब म्हणजे आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामना (India vs Pakistan match) हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) असणार आहे. याच बाबीवरुन आता राजकारण रंगत आहे. या पाकिस्तानसोबतच्या सामन्याला विरोध करण्यात येत आहे, ज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही (MNS) समावेश आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडली. "भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतात होणं हे अजिबात पटणारं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनाही कदापि पटलं नसतं," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसंच याबाबत भाजप आणि शिवसेनेची भूमिका काय असा सवालही त्यांनी विचारला आहे. यावेळेस उद्धव ठाकरेंवर मात्र निशाणा साधत 'उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे' अशी खोचक टीका त्यांनी केली.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे.हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 29, 2023
नेमका वाद कशामुळे ?
या वादाचे मुख्य कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, पाकिस्तानच्या संघाने भारतात येऊन खेळू नये. या गोष्टीला त्यांचा विरोध होता. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवून सत्तेवर आलेले आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित असलेले राज्याचे सद्यकालीन मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोबतच ठाकरे गटदेखील बाळासाहेबांच्या विचारांशी किती एकनिष्ठ आहे, हे यातून दिसेल.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत, तर आशिष शेलार हे खजिनदार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी (ICC) आणि बीसीसीआयकडे (BCCI) भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती, मात्र ती विनंती फेटाळून लावण्यात आली होती. त्यामुळे बाळासाहेबांना मानणा-या दोन्ही गटांचं यावर काय म्हणणं आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.