
नवी दिल्ली : पहिल्याच पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आणि महापालिकेच्या सफाईची पोलखोल झाली. अशातच रेल्वेच्या गलथानपणामुळे नवी दिल्लीतही पावसामुळे रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्यात वीजेचा प्रवाह उतरल्याने एका महिलेला (Victims of rain) आपला जीव गमवावा लागला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी अहुजा नावाची महिला तिच्या पतीसोबत ट्रेनने जाणार होती. त्यासाठी ती रेल्वे स्टेशनवर गेली. दिल्ली रेल्वे स्थानकात पावसामुळे विद्युत तारा साचलेल्या पाण्यात बुडाल्या होत्या. त्यामध्ये विद्युत प्रवाह चालू होता. या विजेचा धक्का लागून साक्षी अहुजाचा मृत्यू झाला.
साक्षी आहुजा नावाची महिला पहाटे साडेपाच वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तिच्यासोबत आणखी दोन महिला आणि तीन मुले होती. साक्षीला चंदीगडला जायचे होते. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पाण्यातून चालत असताना तोल जाऊ नये म्हणून त्या महिलेने विजेचा खांब पकडला. त्यामुळे महिलेला विजेचा धक्का बसला. त्यानंतर उपस्थित लोकांनीही महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, साक्षीसोबतची तिची नातेवाईक असलेल्या माधवी चोप्रा या महिलेने संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी एसआय नसीब चौहान यांच्याकडे तपास सोपवला असून पुढील तपास सुरू आहे.