
तर १५ पक्ष एकत्र येणे कठीण! आम आदमी पार्टीने केली जाहीर घोषणा
नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी विरोधात एकवटलेल्या देशभरातील (Nation) विरोधकांच्या बैठकीतच आम आदमी पार्टीने धूमाकूळ घातला. तरीही कोणीही जुमानत नसल्याचे पाहून संतापलेल्या अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीनंतर थेट निवेदन प्रसिद्ध करत विरोधकांच्या एकतेला पहिला तडा दिला.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी काय करता येईल यावर मंथन करण्यासाठी काल पाटण्यात विरोधकांची मोठी बैठक झाली. या बैठकीत आम आदमी पार्टीसह देशभरातील १६ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल दिसले नाहीत. त्यानंतर एक निवेदन प्रसिद्ध करत आम आदमी पार्टीने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. नाराज का आहोत याचे कारणही त्यंनी सांगून टाकले आहे.
केंद्र सरकारने दिल्लीतील बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार दिल्ली सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात एक अध्यादेश आणला आहे. संसदेच्या अधिवेशनात कदाचित हे विधेयक सादर करून त्याला मंजुरी घेतली जाऊ शकते. लोकसभेत भाजपचे बहुमत असल्याने येथे हे विधेयक सहज मंजूर होईल मात्र राज्यसभेत तशी परिस्थिती नाही. राज्यसभेत जर विधेयक मंजूर झाले नाही तर भाजपच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे राज्यसभेत या अध्यादेशाविरोधात काँग्रेससह अन्य पक्षांनी पाठिंबा द्यावा यासाठी केजरीवाल प्रयत्न करत आहेत. अनेक विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसने अजूनही आपले पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळे आप संतप्त आहे. काल याच मुद्द्यावर बैठकीत वादही झाल्याचे समजते.
आपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अध्यादेशासंदर्भात काँग्रेसने जे धोरण घेतले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीला कोणत्याही आघाडीत सहभागी होणे कठीण होईल जिथे काँग्रेस असेल. जोपर्यंत काँग्रेस या अध्यादेशाची सार्वजनिक रुपात निंदा करत नाही आणि या अध्यादेशाला विरोध करण्याची घोषणा करत नाही तोपर्यंत कोणत्याही बैठकीत सहभागी होणे आपसाठी कठीण आहे. आती ती वेळ आली आहे की काँग्रेसने ठरवावे की ते दिल्लीतील नागरिकांच्या बरोबर आहेत की केंद्रातील मोदी सरकारच्या बरोबर आहेत.
दरम्यान, काल झालेल्या या बैठकीनंतर केजरीवाल लगेचच दिल्लीला निघून गेले. नितीश कुमारांना ज्यावेळी हे विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की त्यांचे विमान निघणार होते म्हणून ते ताबडतोब निघून गेले. निवेदनात म्हटले आहे, की काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि प्रत्येक मुद्द्यावर भूमिका घेत असतो. मात्र अध्यादेशावर काँग्रेसने अद्याप काहीच सांगितलेले नाही ज्यामुळे संशय निर्माण होत आहे.