
ठाणे : घोडबंदर रोडवरील सर्वात वर्दळीचा परिसर म्हणून कापूरबावडी आणि माजिवाडा जंक्शनचा समावेश होतो. या ठिकाणी अनेक रस्ते एकत्र येत असल्याने वाहतूक गुंतागुंतीची होते.
कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन येथील वाहतुकीचे परिचलन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी या दोन्ही जंक्शनची फेरआखणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी सविस्तर आराखडा सर्व्हे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनवरील वाहतुकीचे परिचलन अनियोजित पद्धतीने होते आहे. मोकळ्या मैदानात वाहने हवी तशी ये जा करत असल्याचे चित्र या भागात दिसते. हे चित्र बदलण्यासाठी लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक बेटाची रचना यांचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. वाहतुकीचे परिचलन सुनियोजित पद्धतीने व्हावे म्हणून आराखडा तयार करून त्याची जलद अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त बांगर यांनी दिली आहे.
पालिका क्षेत्रातील वाहतुकीच्या या आढावा बैठकीस, डॉ. विनयकुमार राठोड, नगर अभियंता प्रकाश सोनाग्रा, उपनगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे, शुभांगी केसवानी, उपायुक्त दिनेश तायडे आणि शंकर पाटोळे उपस्थित होते.
रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त व्हावा
पावसाळ्यात विटावा पुलाखाली जमणारे पाणी वाहतुकीस अडथळा करते. त्यामुळे त्या भागाची वाहतूक पोलिसांबरोबर संयुक्त पाहणी करण्यास आयुक्त बांगर यांनी सांगितले. तसेच, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन येथे झेब्रा क्रॉसिंगचे काम पावसाची उघडीप असतानाच करून घ्यावे, असेही त्यांनी नमूद केले. त्याशिवाय, नितीन कंपनी चौकातील सिग्नलची आवश्यकता, वाहनांना दिला जाणारा वेळ यांचाही आढावा घेण्यास सांगितले. रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त राहील, याची काळजी घ्यावी. तसेच रिक्षा परिचलनाला शिस्त लागण्यासाठी तेथे वाहतूक पोलिसांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले.
अधिकृत पार्किंग
कापूरबावडी नाका, माजिवडा नाका येथील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागांवर असमाजिक तत्त्वांचा वावर असतो. गर्दुल्ले असतात. अनधिकृत पार्किंग केले जाते. याला आळा बसण्यासाठी मळक्या, अस्वच्छ जागा साफ करून तेथे नियंत्रित अधिकृत पार्किंग केले जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवल्या जात आहेत. जागेच्या वापराबरोबर महापालिकेस त्यातून उत्पन्नही मिळेल, असे आयुक्त बांगर यांनी नमूद केले आहे.