विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचे सडेतोड उत्तर
पुणे : आधीचे सरकार घरी होते, आमचे सरकार लोकांच्या दारी जातेय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेवर सडेतोड उत्तर दिले आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात अतोनात खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून मागील काही दिवसांपासून करण्यात येत होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमांवेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. राज्यातील अनेक नागरिकांना शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे लाभ होत आहे. त्यांना एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध करुन देत आहोत.
राज्यातील अनेक नागरिकांना शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे लाभ होत आहे. त्यांना एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध करुन देत आहोत. त्यामुळे नागरिकांचादेखील या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद आहे. या कार्यक्रमात वाटत असलेले साहित्य आणि दाखले आपण बघतो आहोत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी वायफळ खर्च होत नाही आहे. उलट नागरिकांना याचा फायदाच होत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
एका जाहिरातीमुळे आमच्या सरकारमध्ये दुरावा निर्माण होत नाही आहे. आमचा फेव्हिकॉलचा जोड आहे. आमची युती आजची नाही तर फार जुनी आहे. या युतीत जो खडा ठरला होता. त्या खड्याला आम्ही बाहेर काढलं आहे. त्यामुळे माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या जाहिरातीमुळे कोणताही वितुष्ट निर्माण झाला नाही आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमची युती कधीच तुटणार नाही, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.