नवी दिल्ली: पुढील महिन्याच्या म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसेच पक्ष संघटनेतही मोठे फेरबदल केले जाऊ शकतात, असंही सांगण्यात येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू होती.
ज्यासाठी भाजपा एनडीएचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. तेलगू देसम पक्ष, जेडीएस, अकाली दल आणि हम सारख्या पक्षांशी सतत चर्चा सुरू आहे. याशिवाय इतर काही प्रादेशिक पक्षांसोबत युतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही लोकांना पक्षसंघटनेत पाठवले जाऊ शकते. तसेच संघटनेतील अनेक बड्या चेहऱ्यांना डच्चू दिला जाईल असं निश्चित मानलं जात आहेत. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने सांगितले की, कोण बाहेर आणि कोण आत हे फक्त पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या दोनच लोकांना हे माहित आहे, बाकी सर्व अंदाज वर्तवत आहेत.
पक्ष संघटनेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दोन बड्या मंत्र्यांकडे दिली जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. लोकसभेतील खासदारांना मंत्रिमंडळात प्राधान्य द्यावे, असे बोलले जात आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली आहे त्यांना काढलं जाणार नाही. गेल्या फेरबदलात प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांना वगळण्यात आले होते. जेडीयू एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर आरसीपी सिंह यांचीही जागा रिक्त आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटालाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र, बिहार आणि बंगाल ही राज्ये भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या राज्यांतील नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशी बातमी आहे.