Tuesday, June 24, 2025

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या आमदाराची स्टंटबाजी!

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या आमदाराची स्टंटबाजी!

वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात केली भीमगर्जना!


चंदगड : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात स्टंटबाजी करत जोपर्यंत अजितदादांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, अशी राणा भीमदेवी थाटात भीमगर्जना केली.


वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमातच आमदारांनी ही घोषणा केल्याने केवळ अजितदादांना (Ajit Pawar) खूश करण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी केलेली ही स्टंटबाजी आहे. यांना इतका पुळका आला होता तर आधीच वाढदिवस साजरा करणार नाही, असे का जाहीर केले नाही, अशी चर्चा आता मतदारसंघात सुरु आहे.


दरम्यान, राजेश पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात अनेक वादळं येणार आहेत. ही वादळं थोपवण्याची कामं आपल्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करायची आहेत. तुम्ही माझा ५६वा वाढदिवस साजरा केला, पण मी याठिकाणी सांगू इच्छितो, जोपर्यंत अजितदादांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री करत नाही, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत राजेश पाटलांचा वाढदिवस साजरा करायचा नाही, अशी शपथ घेऊया.


तसेच काँग्रेस राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकसंध राहण्याचे आवाहन राजेश पाटील यांनी केले. शरद पवार यांनी भाकरी परतली पण चंदगड विधानसभेची भाकरी परतू नका, असे म्हणत कार्यकर्त्यांना सोबत राहण्याचे आवाहन पाटील यांनी केले.


दरम्यान, मागील महिन्यात अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यात कागलमध्ये मेळावा घेत पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या‍ जिल्‍ह्यात राष्‍ट्रवादी काँग्रेसची अवस्‍था दयनीय आहे. एकेकाळी पाच आमदार आणि दोन खासदार देणाऱ्या‍ जिल्‍ह्यात पक्षाचे केवळ दोन आमदार आहेत. अनेक तालुक्यांत पक्षाची ताकद नाही, हे बरोबर नाही. राष्‍ट्रवादीची स्‍थापना जिल्‍ह्यात झाली. त्यावेळी मोठी ताकद होती. ही ताकद वाढणे अपेक्षित होते. मात्र, उलट परिस्‍थिती आहे. ही ताकद वाढविण्यासाठी जनतेचे प्रश्‍‍न हातात घेतले पाहिजेत. रस्‍त्यावर उतरून आंदोलने केली पाहिजेत. लोकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. केवळ पोस्‍टर लावून आणि घोषणा देऊन पक्ष वाढत नाही. चांगले काम केले तर लोक तुम्‍हाला नक्‍कीच निवडून देतात. जिल्‍ह्यात पक्षाचा पालकमंत्री असेल तर ताकद मिळते. राष्‍ट्रवादीच्या स्‍थापनेवेळी ते शक्य होते. पतंगराव कदम यांना संधी मिळाली. तेथून काँग्रेस पुढे गेली. आता परत स्‍थानिक स्‍वराज्य संस्थांत राष्‍ट्रवादीला एक नंबरचा पक्ष बनवा. मग जागा वाटपात काय करायचे, ते मी बघतो. यात मी वस्‍ताद आहे, असे अजित पवार म्‍हणाले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >