Tuesday, July 9, 2024
Homeताज्या घडामोडीNashik : नाशिक जिल्ह्यातील 'आठ' ग्रामसेवकांवर कारवाई

Nashik : नाशिक जिल्ह्यातील ‘आठ’ ग्रामसेवकांवर कारवाई

तीन निलंबित, तीन बडतर्फ तर दोघांच्या सेवा समाप्ताचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी चौकशीअंती जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांवर कारवाई निश्चित केली आहे. त्यात तीन ग्रामसेवक निलंबित, तीन बडतर्फ तर दोन कंत्राटी ग्रामसेवकांची सेवा समाप्ताची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या कारवाईची माहिती देण्यास जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग टाळाटाळ करीत असल्याबद्दल विभागाच्या कार्य पद्धतीवर संशय व्यक्त होत आहे.

स्थानिक पातळीवर गावांचा विकास व्हावा, यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारा निधी आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग केला जात आहे. या निधीतून गावांचा विकास व्हावा या ऐवजी अनेक ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक हे सरपंचांसह पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःचा विकास साधत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून सातत्याने केल्या जात आहेत. दुरूस्तीची कामे न करताच बिले काढणे, मर्जीतील लोकांना कामे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, नोंदवह्या १ ते ३३ नोंदी अपुर्ण असणे अशा विविध प्रकारचे ठपके यापुर्वीच ग्रामसेवकांवर ठेवून अनेकांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. अशाच प्रकारे कामात अनियमितता करतानाच विविध आरोपांवरून आठ ग्रामसेवकांवर कारवाई प्रस्तुत करण्यात आली आहे.

अनेक गावांत ग्रामसेवक हजर राहात नसल्याच्या तक्रारीं सातत्याने वाढत आहे. त्यामुळे विकासकामे देखील रखडली आहे. सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते. परंतु ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक कामे अपूर्ण राहतात. ती मुदतीत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांविरुद्ध ग्रामीण भागात तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्य वाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -