अहमदनगर: आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) कालच्या डोंगरगण शहरातील मुक्कामानंतर अहमदनगर शहरात दाखल होणार आहे. तर काल अंकुशनगर इथे मुक्कामी असलेली मुक्ताबाईंची (Sant Muktabai) पालखीचं आज बीड जिल्ह्यात प्रवेश करून गेवराईमध्ये मुक्कामी असणार आहे.
हजारो वारकऱ्यांच्या पायी प्रवासाचा आजचा बारावा दिवस आहे. ज्या-ज्या ठिकाणी पालखी थांबते, त्या-त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. सत मुक्ताबाईंसह संत निवृत्तीनाथांची पालखी २ जून रोजी निघाली होती. नगर जिल्ह्यातील डोंगरगण शहरात मुक्कामी असलेली संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे राहुरी तालुक्यातील डोंगरगण गावाकडे मार्गस्थ झाली होती. कालच्या डोंगरगण येथील मुक्कामानंतर पालखी अहमदनगर शहरात प्रवेश करणार आहे.
तर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल अंकुशनगर गावी मुक्कामी होती. आज पालखीचा बारावा दिवस असून मुक्कामाच्या ठिकाणाहून पालखी प्रस्थान करत पुढे मार्गस्थ झाली आहे. तर दुपारी शहागड येथे दुपारचा विसावा घेणार आहे. त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी याच मार्गानं पुढे बीड जिल्ह्यात प्रवेश करून गेवराई भागात विसावा घेणार आहे.