-
संतोष रांजणकर
मुरूड : मुरूड एकदरा पुलावर पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने पादचाऱ्यांना व वाहन चालकांना जाता येता कसरत करावी लागत आहे. या पुलाच्या डागडुजीबाबत अनेकदा वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याची दखल घेत शासनाने या पुलाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. परंतू पाऊस पडायला सुरुवात झाली तरीही या पुलाच्या दुरुस्तीला अजून सुरुवात झालेली नाही. या पुलाकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मुरूड एकदरा पुलाची गेले ३० वर्ष बांधकाम खात्याने देखभाल न केल्याने या पुलाची पार दुरावस्था झाली आहे. दर पावसाळ्यापूर्वी या पुलावरील पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या मार्गांची स्वच्छता केली जात होती. त्यामुळे पावसाचे पाणी पुलावर तुंबत नव्हते. पण गेल्या ३० वर्षांपासून पाण्याच्या मार्गांची स्वच्छता न केल्याने पुलावर पावसाचे पाणी तुंबत आहे. या तुंबलेल्या पाण्यामुळे पुल कमकुवत होत आहे. ठिक ठिकाणी कॉन्क्रीट ढासळलेले आहे.
या पुलावरुन महावितरण व दुरसंचार विभागाने केबल अंथरलेल्या आहेत. या केबलमुळे या पुलावरील पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी असलेले मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे या पुलावर दरवर्षी पावसाचे पाणी तुंबत आहे. यामुळे दिवसेंदिवस हा पुल कमकुवत होत आहे.
तरी बांधकाम खात्याने लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करावी व या पुलावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या मार्गांची स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, महाड येथिल सावित्री नदीवरील झालेल्या पुलाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट प्रशासन पहात आहे का, असा संतप्त सवाल वाहन चालकांनी केला आहे.