मुंबई : यंदा उशिराने दाखल झालेला मान्सून आता पुढील ४८ तासांत राज्याच्या आणखी काही भागांमध्ये सरकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांसाठी महत्त्वाच्या शहरांसह पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यावेळी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ३०-४० किमी प्रतितास वेग असलेल्या सोसाट्याच्या वारा असेल. यामुळे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांनीही आपला शेतमाल योग्य त्या ठिकाणी ठेवावा. पश्चिम किनारपट्टीवरील अनुकूल स्थितीमुळे नैर्ऋत्य मान्सूनने गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे मान्सून आता लवकरच संपूर्ण राज्यात हजेरी लावेल.
मान्सूनच्या प्रगतीत अडथळा बनलेले मध्य पूर्व अरबी समुद्रात सक्रिय असलेले बिपरजॉय चक्रीवादळ सध्या संथ गतीने उत्तरेकडे सरकत आहे. वादळ जसे उत्तरेकडे सरकत जाईल, तसे पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वारे सक्रिय होत जातील. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग व्यापत मान्सून पश्चिम बंगालच्या काही भागांत प्रवेश करू शकतो. मान्सूनची किनारपट्टीवर प्रगती दिसत असली, तरी राज्याच्या इतर भागांतील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी घाई करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.