Friday, January 17, 2025
Homeमहत्वाची बातमीदेवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रातून ४५ जागा जिंकण्याचा निर्धार

देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रातून ४५ जागा जिंकण्याचा निर्धार

अमित शहा यांनी केली घोषणा

भाजपने लोकसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले

नांदेड : भाजपने लोकसभा निवडणूकीसाठीचं रणशिंग फुंकलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केल्याची घोषणा अमित शाह यांनी आज केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची नांदेडमध्ये जाहीर सभा झाली. अमित शाह यांच्या भाषणाआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या ९ वर्षात किती चांगली कामे झाली याचं विश्लेषण केलं. त्यानंतर अमित शाह यांनी भाषण केलं. अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत असताना मोठा दावा केला.

देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे, असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला विकासात पुढे आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले, अशा शब्दांत अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

सर्वात आधी शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करुयात. मी आज नांदेडच्या पवित्र भूमीत आलो आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा ३५० वं वर्ष आहे. मी शिवरायांना प्रणाम करुन माझ्या भाषणाला सुरुवात करतो. नांदेडच्या भूमीला गुरुगोविंद सिंह यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांच्या पुण्यस्मृतींना नमस्कार करतो, अशी सुरुवात अमित शाह यांनी केली.

मराठवाड्याचा प्रांत एकेकाळी हैदराबादचा भाग होता. पण नांदेड आणि मराठवाड्याला देशाला स्वातंत्र्य मिळालेला नव्हता. इथल्या जनतेला अमानुष राजवटीचा सामना करावा लागला. १७ सप्टेंबर १९४८ ला स्वातंत्र्य मिळालं होतं, असं शाह म्हणाले.

भाजपचं सरकार आणि मोदींच्या नेतृत्वातील सरकारने आज नऊ वर्ष पूर्ण केले आहेत. मी नांदेड आणि महाराष्ट्राच्या जनतेचा धन्यवाद बोलायला आलो आहे. महाराष्ट्राच्या जनतेने खुल्या मनाने भाजपला मतदान केलं होतं. मोदी सरकारचे ९ वर्ष हे भारत गौरव, विकासाचे ठरले आहेत. हे वर्ष गरीब कल्याणाचे वर्ष ठरले आहेत. १० वर्षाच्या काँग्रेस सरकारनंतर मोदी सरकार आलं तेव्हा सर्वच क्षेत्रात परिवर्तन घडवण्यात आलं, असंही अमित शाह म्हणाले.

सोनिया-मनमोहन सरकारमध्ये शरद पवार हे देखील होते. हे सरकार सर्वात भ्रष्ट सरकार होतं. १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला. गेल्या ९ वर्षात आमचे विरोधक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करु शकले नाहीत. आधी देशात बॉम्बस्फोट व्हायचे. त्यावेळी मनमोहन सिंह यांच्या मुखातून शब्द निघायचे नाही. पण मोदींनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला घरात घुसून मारलं. नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात गरीब कल्याणाची कामे झाली, असंही अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -