
कोल्हापुरातील तणावावरून मनसेचा कडक इशारा
मुंबई : कोल्हापुरातील घटनेवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हॉट्सअॅप अकाऊंटच्या स्टेटसवर मुघल बादशाह औरंगजेबाचा फोटो शेअर करून त्याचे उदात्तीकरण करणारा मजकूर शेअर करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापुरातल्या हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. काही ठिकाणी जमाव प्रक्षुब्ध झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेवर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आता कोल्हापुरातल्या हिंदुत्त्ववादी संघटनांना पाठींबा दर्शवला असून याप्रकरणी “ऐकलं तर ठीक, नाहीतर मनसेही मैदानात उतरेल आणि आपल्या मनसे स्टाईलमध्ये सडेतोड प्रत्त्युत्तर देईल,” असा कडक इशारा दिला आहे.
देशपांडे म्हणाले, लोकांना दंगली नको आहेत. परंतु आम्ही हिंदू म्हणून असल्या घाणेरड्या गोष्टी खपवून घेणार नाही. आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे नम्र इशारा देतोय की, असले प्रकार थांववा. या नम्र इशाऱ्यानंतर ऐकलं तर ठीक, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने इशारे देता येतात. रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही उतरू, त्यानंतर होईल ते होईल. महाराष्ट्र सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर आम्ही त्यांचा बंदोबस्त करायला सक्षम आहोत.
ते पुढे म्हणाले, ज्या लोकांचे औरंगजेबावर प्रेम आहे त्यांच्या पार्श्वभागावार लाथा घाालायला हव्यात. औरंगजेबाला जिथे पुरले आहे (दफन केले आहे), तिथे यांनाही पुरायला पाहिजे. त्याचबरोबर ज्या लोकांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी. त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज कसला करता. अशी अॅक्शन झाल्यावर त्यावर रिअॅक्शन येणारच. हिंदूंकडून अशी प्रतिक्रिया येणं साहजिक आहे, असे समर्थन देशपांडे यांनी केले.