पाच किंवा त्यापेक्षा जादा लोकांना एकत्र जमण्यास मनाई
कोल्हापूर : कोल्हापुरात लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे हद्दीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात १९ जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.
आक्षेपार्ह स्टेटस लावण्यावरुन निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नानंतर त्या संदर्भातील अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मंगळवारी रात्री देण्यात आला. पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊन वा स्टेटसमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अहवालानुसार अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी तत्काळ जिल्ह्यात हा बंदी आदेश लागू केला आहे.
यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात पाच अगर पाचहून अधिक लोकांनी एकत्र जमणे, जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे याला बंदी असेल. तसेच आदेशानुसार शस्त्रे, बंदूक, सोटा, तलवारी, भाले, सुरा अगर काठी किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्या वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्र किंवा क्षेपणास्त्र सोडवण्याची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीची अथवा प्रेते किंवा आकृत्या त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन, जाहीरपणे घोषणा, गाणी म्हणणे, वाद्ये वाजवणे, ज्यामुळे सभ्यता अथवा नीतिमत्तेला धोका पोहोचेल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी भाषणे करणे, हावभाव करणे याला बंदी असेल.