Tuesday, July 1, 2025

आता देशभरातील सिग्नलिंग यंत्रणेचे ऑडिट करणार!

आता देशभरातील सिग्नलिंग यंत्रणेचे ऑडिट करणार!

रेल्वे मंत्रालयाने घेतला 'हा' निर्णय


नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला. तर १००० हून अधिक जण जखमी झाले. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली. आता देशभरातील सिग्नलिंग यंत्रणेचे ऑडिट करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.


रेल्वे बोर्डाने सर्व महाव्यवस्थापकांना १४ जूनपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण भारतात चाचणी केली जाणार आहे. तो अहवाल आल्यानंतर यंत्रणा योग्यरित्या कार्य करत आहे याची खात्री करण्यासाठी त्यापैकी १० टक्के ठिकाणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुन्हा चाचणी केली जाईल. याशिवाय, रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या हाऊसिंग सिग्नलिंग उपकरणांची चौकशी देखिल करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.


रेल्वे मंत्रालयाच्या आदेशात असेही म्हटले आहे की, सिग्नलिंग सिस्टीम रिले रूममधूनच नियंत्रित केली जाते. मात्र, रिले रूमची तपासणी केल्यानंतर दुहेरी सिग्नलिंग यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहे की नाही हे निश्चित केली जाईल.


बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या या रेल्वे दुर्घटनेत कोणता कर्मचारी दोषी आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. ट्रेनच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड झाली असावी, अशी शक्यता रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केली आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली.


त्यानंतर सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात, रेल्वे बोर्डाने निर्देश दिले आहेत की स्थानक हद्दीतील सिग्नलिंग उपकरणांच्या सर्व घुमटांवर विशेष लक्ष देऊन सुरक्षा मोहीम त्वरित सुरू करावी. शिवाय, दुहेरी लॉकिंग सिस्टीम आहे की नाही याची तपासणी करून खात्री करावी, असे बोर्डाने म्हटले आहे.


स्थानकांच्या सर्व रिले रूम्स तपासल्या जाव्यात, या रिले रूमचे दरवाजे उघडण्यासाठी/बंद करण्यासाठी डेटा लॉगिंग आणि एसएमएस अलर्ट तयार केले जात आहेत याचीही खात्री करावी, असे बोर्डाने म्हटले आहे. सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन उपकरणांसाठी डिस्कनेक्शन आणि रीकनेक्शनची प्रणाली निर्धारित नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे पाळली जात आहे की नाही हे तपासण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत.


दरम्यान, सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अपघातातील जखमी चालक आणि त्याच्या सहाय्यकाचे जबाब नोंदवले. दोघांवर एम्स-भुवनेश्वरमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी रेल्वे कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी १७० जणांची ओळख पटली आहे.


दोन्ही रुळांवर पुन्हा गाड्या धावू लागल्या


अपघातानंतर आता गाड्या पुन्हा रुळावरून धावू लागल्या आहेत. मदतकार्य पूर्ण झाल्यानंतर एनडीआरएफच्या सर्व ९ तुकड्याही परतल्या आहेत. वंदे भारतही अपघातग्रस्त ट्रॅकवरून गेली आहे.


बारगढमध्ये मालगाडी रुळावरून घसरली


बालासोर दुर्घटनेच्या तीन दिवसांनंतर सोमवारी ओडिशाच्या बारगड जिल्ह्यात मालगाडीच्या पाच बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिथे हा अपघात झाला, तो खाजगी नॅरोगेज रेल्वे मार्ग आहे. येथे असलेल्या लाईन, वॅगन, लोको हे सर्व खाजगी कंपनीच्या अंतर्गत येतात. त्याचा रेल्वेशी काहीही संबंध नाही.

Comments
Add Comment