चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-नागपूर महामार्गावर शनिवारी रात्री खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारी कार आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली. नागभीड-नागपूर महामार्गावर कानमपा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती आहे. जखमीला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहा झाली आहे.
मृतांमध्ये एका चिमुलकलीसह चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये पाच नागपूर जिल्ह्यातील आणि एक भंडारा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृताची ओळख पटवली.
रोहन विजय राऊत (३०), ऋषिकेश विजय राऊत (२४), गीता विजय राऊत (४५), सुनीता रूपेश फेंडर (४०), प्रभा शेखर सोनवणे (३६) आणि यामिनी रूपेश फेंडर (९) ही मृतांची नावे आहेत.