नितेश राणे यांनी लगावला खोचक टोला!
पुणे: आर्यन खानची काळजी करणाऱ्या ताईंना लव्ह जिहादचा सामना करावा लागलेल्या आमच्या भगिनींचे दु:ख दिसत नाही का? त्यांनाही कधीतरी भेटायला या, असा सुप्रिया सुळे यांना खोचक टोला लगावत भाजप आमदार नितेश राणे यांनी लव्ह जिहाद प्रकरणी गप्प असलेल्या महाविकास आघाडीचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी असे गुन्हे करणाऱ्यांना आता गृहमंत्री महाविकास आघाडीचा राहिला नसून शिवसेना-भाजप सरकारचा आहे. तसेच हिंदूंचे अथवा हिंदू भगिनींचे जबरदस्तीने धर्मांतर कराऱ्याला दोन पायांवर परत जाऊ देणार नाही असा सज्जड दम भरला. यावेळी लव्ह जिहाद पिडित एका तरुणीने तिच्यासोबत घडलेली घटना माध्यमांसमोर सांगतली.
नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मुंढवा भागात लव्ह जिहादची घटना घडल्याप्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मुंढवा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक ते जय हिंद चौक घोरपडी दरम्यान मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘हिंदू मुलींचा जीव घेणार्या नराधम जिहादीला फाशी झाली पाहिजे’ ही मागणी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी केली. पुण्यातील पीडीत तरुणीचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी यावेळी केली.
‘राज्यात हिंदू मुलींचे धर्मांतर होत नाही. अन्याय – अत्याचार होत नाही. तिहेरी तलाक राहिला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका राज्यातील काही नेते मंडळी घेत आहेत’, अशा शब्दात नितेश राणे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. तसेच या लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना वाचविण्याचे काम काही पोलीस अधिकारी करित आहेत. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले.