मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी आणि विकासकाच्या बेजबाबदारपणामुळे पदपथाच्या दिव्याच्या उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागल्याने सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रूजमधील वाकोला येथे घडली. याच दुर्घटनेत पाच वर्षांचा चिमुकला जखमी झाला आहे. त्याच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाकोल्यातील चैतन्यनगर येथे काल (२ जून) रात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत तेहरीन इफ्तिकार या सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर तनिष शिंदे हा पाच वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.
हे दोघेही काल रात्री दहा वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला खेळत होती. ज्या ठिकाणी ते खेळत होते तिथे एक पथदिवा आहे. त्याची वीज वाहिनी मोकळीच होती. खेळता खेळता या मुलांचा स्पर्श वीज वाहिनीला झाला आणि दोन्ही मुले खाली कोसळली. जखमी अवस्थेत त्या मुलांना स्थानिकांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारादरम्यान तेहरीन इफ्तिकारचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची पूर्ण जबाबदारी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांची आणि बाजूला काम सुरु असलेल्या विकासकांची आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी संतप्त स्थानिक नागरीकांनी केली आहे.