नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेतील पीडित व्यक्तींच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. ओडिशातील या दुर्दैवी रेल्वे अपघातातील मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी आणि जखमींसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी मदत जारी केली आहे. या अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, गंभीर जखमींसाठी २ लाख आणि किरकोळ जखमींसाठी ५० हजार रुपये मदत सरकारने जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या अंदाजे २०० प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय ३२ जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.
दुसरीकडे, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, लोकांना नेण्यासाठी सुमारे ५० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेस बोलावण्यात आल्या आहेत.