मुंबई: म्हाडाने मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अशा १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक जाहीर करण्यात आलेल्या सात इमारतींचा समावेश आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यामध्ये १५ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४२४ निवासी आणि १२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी राहत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, यातील १५५ रहिवाशांनी स्वतःच्या निवार्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत २१ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील रहिवाशी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. तसेच २२२ रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्यात येणार आहे.
म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या १५ अतिधोकादायक इमारतींची यादी पुढीलप्रमाणे :
1) इमारत क्रमांक ४-४ ए,नवरोजी हिल रोड क्र. 1, जॉली चेंबर (मागील वर्षीच्या यादीतील)
2) इमारत क्रमांक ७४ निझाम स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
3) इमारत क्रमांक ४२, मस्जिद स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
4) इमारत क्रमांक ६१-६१ए , मस्जिद स्ट्रीट
5) इमारत क्रमांक २१२ जे पांजरपोळ लेन
6) इमारत क्रमांक १७३-१७५-१७९ व्ही के बिल्डिंग, प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी
7) इमारत क्रमांक २-४-६ नानुभाई देसाई रोड, मुंबई
8) इमारत क्रमांक १-२३ नानुभाई देसाई रोड, मुंबई
9) इमारत क्रमांक ३५१ ए, जे एस एस रोड मुंबई
10) इमारत क्रमांक ३८७-३९१ बदामवाडी, व्ही .पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
11) इमारत क्रमांक १७ नारायण निवास , निकटवाडी
12) इमारत क्रमांक ३१सी व ३३ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग, गिरगावचौपाटी (मागील वर्षीच्या यादीतील)
13) इमारत क्रमांक १०४-१०६ ,मेघजी बिल्डिंग अ, ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील)
14) इमारत क्रमांक ४० कामाठीपुरा ४ थी गल्ली
15) अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस – ३ विभाग, इमारत क्रमांक ४ बी व ४२८, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)
रहिवाशांनी सहकार्य करावं: म्हाडाचं आवाहन
अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशाना मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्यास सहकार्य करावे व स्वतःच्या आणि आपल्या पारिजनांच्या सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित तसेच वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे.