Tuesday, April 29, 2025

देशमहत्वाची बातमी

नवीन संसद भवन १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब

नवीन संसद भवन १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले गौरवोद्गार

नवी दिल्ली: आजचा दिवस देशासाठी शुभ आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अमृत महोत्सवात भारतातील जनतेने संसदेची ही नवी इमारत आपल्या लोकशाहीला भेट म्हणून दिली आहे. ही केवळ एक इमारत नाही तर १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात काढले. नवीन संसदेत नरेंद्र मोदी यांनी आपलं पहिल भाषण केलं. त्यांच्यासमवेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या सेंगलोलचे महत्व विशद केले. ते म्हणाले, जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जाते. आज या ऐतिहासिक प्रसंगी संसदेच्या नवीन इमारतीत पवित्र सेंगोलची स्थापनाही करण्यात आली आहे. महान चोल साम्राज्यात, सेंगोल हे कर्तव्याचा मार्ग, सेवेचा मार्ग, राष्ट्राच्या मार्गाचे प्रतीक मानले जात असे. राजाजी आणि अधिनाम या संतांच्या मार्गदर्शनाखाली ते सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनले. आशीर्वाद देण्यासाठी तामिळनाडूहून आलेले अध्यानमचे संत यांना मी पुन्हा एकदा नमन करतो. अलीकडे, या इतिहासाशी संबंधित बरीच माहिती मीडियामध्ये उघड झाली आहे. त्यामुळे मला त्या तपशिलात जायचे नाही. आपण पवित्र सेंगोलची प्रतिष्ठा परत मिळवू शकलो हे भाग्य आहे. जेव्हाही कार्यवाही सुरू होईल तेव्हा हे सेंगोल सर्वांना प्रेरणा देत राहील.

भारत लोकशाहीची जननी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत हा केवळ सर्वात मोठी लोकशाही असेलला देश नाही तर लोकशाहीची जननी आहे. जागतिक लोकशाहीचा तो पाया आहे. लोकशाही हा आपला 'संस्कार', विचार आणि परंपरा आहे. आज नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. या वास्तूमध्ये वारसा, वास्तुकला, कला, कौशल्य, संस्कृती तसेच संविधानाचा सुरेख संगम आहे.

आपलं संविधान हाच आपला संकल्प

आपलं संविधान हाच आपला संकल्प असल्याचंही यावेळी पंतप्रधान म्हणाले. जो थांबतो, त्याचे नशीबही थांबते. जो चालत राहतो, त्याचे नशीबही चालत असते. म्हणूनच चालत राहा. गुलामगिरीनंतर आपल्या भारताने खूप काही गमावून आपला नवा प्रवास सुरु केला. या प्रवासात अनेक चढउतार आले. अनेक आव्हानांवर मात करत आपला देश स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात प्रवेश करत आहे.

नवीन संसद भवन ही काळाची गरज होती, हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज

संसदेच्या जुन्या इमारतीत प्रत्येकाला आपापली कामे पूर्ण करणे किती कठीण जात होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या होत्या, बसण्यासाठी जागेचे आव्हान होते. नवीन संसद भवनाची गरज गेल्या अडीच दशकांपासून चर्चेत होती. आगामी काळात खासदारांची संख्या किती वाढेल, ते लोक कुठे बसतील, हेही पाहावे लागेल.

संसदेची नवीन इमारत बांधणे ही काळाची गरज होती. भव्य इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे याचा मला आनंद आहे. यावेळीही सूर्यप्रकाश थेट या सभागृहात येत आहे. विजेची किंमत कमीत कमी असावी, अत्याधुनिक गॅजेट्स प्रत्येकासाठी उपलब्ध व्हाव्यात. याची काळजी घेण्यात आली आहे.

नवीन इमारतीतील श्रमिकांना समर्पित डिजिटल गॅलरी

मोदी म्हणाले- ६० हजार कामगारांना रोजगार देण्याचे काम संसद भवनाने केले. त्यांनी घाम गाळला आहे. त्यांच्या श्रमाला समर्पित डिजिटल गॅलरी तयार करण्यात आली आहे, कदाचित जगात पहिल्यांदाच असे घडले आहे. संसदेच्या उभारणीतील त्यांचे योगदानही अजरामर झाले आहे.

Comments
Add Comment