कणकवली (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जो मानसन्मान देतात तेवढा उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेबांना कधी दिला नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना जाहीर सभेतून कसे अपमानित करून पाठवले, हे संपूर्ण राज्यातील जनतेने पाहिले आहे. अशा लोकांना आडवाणी किंवा भाजपबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली.
पुढे नितेश राणे म्हणाले की, सकाळी उठून संजय राऊत हे संसद भवन उद्घाटनाची तीच तीच टेप वाजवित आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल बोलत आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी लवकरच बरे होतील. तेव्हा संजय राऊत त्यांच्याबद्दल तेव्हाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे कसे वागले हे सांगतील काय? शिवसेनेत राऊत यांच्यापेक्षा कित्येक उन्हाळे, पावसाळे जास्त पाहिलेले नेते आहेत. मनोहर जोशी हे सेनेचे काम करत होते, तेव्हा तुम्ही लोकप्रभामध्ये विरोधात लिहीत होता. जेव्हा ते शिवसेना वाढवत होते. तेव्हा उद्धव ठाकरे हे फोटो काढायला कॅमेरा साफ करत होते. मात्र याच माजी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी यांना जाहीर सभेतून कसे अपमानित करून पाठवले हे संपूर्ण राज्यातील जनतेने पाहिले आहे. दिवाकर रावते, रामदास कदम अशा अनेकांचा अपमान कशा प्रकारे केलात? हे आम्हाला माहीत आहे. संसद भवनच्या कार्यक्रमात तुम्हाला आमंत्रणच नाही. कारण तुमचा पक्षच राहिलेला नाही. असे असताना बहिष्काराची भाषा करता, असे खडे बोलही नितेश राणे यांनी सुनावले.