देवगड: ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत जाणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर याच अभियानातून नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण होणे गरजेचे आहे. ही योजना कणकवली मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीने राबवा की संपूर्ण महाराष्ट्रात हा पायलट प्रोजेक्ट ठरला पाहिजे. शासन आपल्या दारी अभियान हे नागरिकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवेल, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ नितेश राणे यांच्या हस्ते देवगड येथे करण्यात आला. याचवेळी देवगड तालुका स्तरीय कृषी प्रदर्शनाचाही शुभारंभ झाला. या अभियानांतर्गत लाभार्थ्यांना विविध लाभ व दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी जगदीश कातकर, देवगडच्या गटविकास अधिकारी नायर, तहसीलदार स्मिता देसाई, माजी आमदार अजित गोगटे तसेच सर्व तालुक्याचे कार्यालय प्रमुख यावेळी उपस्थित होते
नितेश राणे यांनी शासन आपल्या दारी अभियानात लावलेल्या विविध खात्याच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी योजना पोहोचवण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारी निवारण करा, अशा सुचना केल्या. त्याचबरोबर कृषी प्रदर्शनातील विविध विक्री स्टॉलला भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले. आपण या योजनांचा आढावा दर महिन्याला घेणार असल्याचे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार स्मिता देसाई यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी बोलताना संपूर्ण कणकवली विभागामध्ये २१ मंडळे असून या सर्वच मंडल स्तरावर शासन आपला दारी कार्यक्रम दर महिन्याला केला जाईल असे आश्वासन दिले.