मुरबाड (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. यातच मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी पट्ट्यात तसेच शहरी भागात देखील उष्णतेच्या प्रमाणात भरपूर वाढ झालेली आहे. रस्त्यावरती अनेक ठिकाणी कृत्रिम सरबत त्याचबरोबर उसाचा रस, निरा, लिंबाचा रस इतर फळांच्या रसांमध्ये देखील खप वाढला असून मोठ्या प्रमाणात लोक थंड ज्या ठिकाणी मिळेल अशा ठिकाणी थांबून उष्णतेला तोंड देत थंड वस्तू आईस्क्रीम असेल किंवा थंड पेय याचे मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहेत.
उष्णतेच्या वाढीमुळे तरुणांनी रोजगार म्हणून रस्त्याच्या कडेला व अनेक ठिकाणी थंड वस्तू व पेय मिळेल अशी व्यवस्था करून छोटे छोटे स्टॉल टाकून लोकांना थंड पेय उपलब्ध करून विक्रीचे काम सुरू होताना दिसत आहेत.
अनेक ठिकाणी आईस बॉक्समध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या थंड करून विकताना दिसत आहेत. लोकांनाही उष्माघाताने त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्या, अशा सूचना अनेक माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचल्याने उष्माघाताची जनजागृती झाल्याने थंड वस्तू व पेय मिळणाऱ्या दुकानांमध्ये थंड वस्तू व पेय प्रचंड प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहेत.
तर मुरबाड – कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या छोटे-मोठे धाबे तसेच हॉटेलमध्ये सुद्धा ताक, लस्सी, मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती हॉटेल चालक-मालक देत आहेत.
यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असला तरी जवळपास मार्च, एप्रिल, मे, या तीन महिन्यांत छोटे-मोठे स्टॉल्स, छोटी-मोठी दुकाने, तसेच छोटी – मोठी हॉटेल्स, धाबे या ठिकाणी थंड पेय म्हणून चांगलीच आर्थिक उलाढाल झाल्याची चित्र दिसून येत आहे.
बऱ्याच वर्षांनंतर यंदाचा कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे थंड पेयासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. हॉटेलमध्ये बसलेला ग्राहक नाश्ता करण्याऐवजी जास्त लक्ष थंड पेयावर भर देत आहे. कारण, यंदा गर्मीचा विक्रम होत आहे. अक्षरशः यंदाच्या गर्मीने माणूस सर्वत्र घामाघूम झालेला दिसत आहे.
– रघुनाथ खारीक, ग्राहक मुरबाड.