
भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची जोरदार मागणी
लांजा : खोरनिनको भट्टीची वाडी येथील विहीरीवरुन राजकारण चांगलेच तापलं आहे. येथील खोरनिनको मधील जलजीवन मिशन कामात सरपंचाची मनमानी, ठेकेदाराची दडपशाही, खोरनिनको गावातील अंधाधुंद कारभार याविरोधात ग्रामस्थांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, पवार बंधूंच्या आवारात असलेली सार्वजनिक विहीर दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी भट्टीचीवाडी येथील ग्रामस्थांनी पत्राद्वारे ग्रामपंचायत कडे केली होती. सुमारे ४० वर्षांपूर्वी सदर विहिरीचे बांधकाम काळ्या दगडाने करण्यात आले व त्यापासून ते आजतागायत सदर विहिरीची देखभाल साफसफाई पवार कुटंबीयांनी केली. सदर विहिरीचा ९० टक्के भाग हा सुस्थितीत व मजबूत होता.
त्यातील काही भागाची डागडूजी आवश्यक होती. दगडाच्या विहिरीतील पाणी हे स्वच्छ व निर्मळ व गोड आहे. तसेच विहिरीचे बांधकाम हे काळ्या पाषाणात केले असल्याने ते एक जुनी वास्तूच ठरली आहे. जर का त्याचे रूपांतर सिमेंट काँक्रीट मध्ये झाले तर त्याचे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कायमचे नष्ट होण्याची शक्यता आहे. सुस्थितीत असलेली विहीर पाडू नये त्याऐवजी डागडुजी करावी अशी ग्रामस्थांची मागणी असताना लोकांचं विरोध डावलून ठेकेदाराशी असलेल्या आर्थिक हितसंबंधांमुळे लांजा पाणी पुरवठा अधिकारी, सरपंच सुहास सोलकर, भट्टीची वाडी ग्रामपंचायत सदस्य दामिनी पांचाळ, ग्रामसेवक भागवत यांनी ठेकेदाराशी संगनमत करून भट्टीचीवाडीतील ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करायची धमकी देऊन शिवाय पर्यायी पाण्याची व्यवस्था न करता लोकांचा विरोध डावलून भट्टीची वाडी येथील पवार घराच्या आवारातील विहीर जबरदस्तीने जेसीबी लावून पाडली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शासनाच्या नियमांना केराची टोपली
खोरनिनको गावात जलजीवन मिशन योजनेतुन ३ विहिरींची कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी साठी ९२ लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी २ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत पण ती निकृष्ट दर्जाची आहेत. या योजनेची निकष म्हणजे शासकीय नियमाला अनुसरून विहिरीचे बांधकाम करावे असे शासनाचे नियम असून त्या नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे. या विहिरीचे गणवत्तेनुसार कुठलेही बांधकाम होताना दिसत नाही. नियमानुसार कोणत्याही शासकीय कामावर फक्त आणि फक्त शासकीय सिमेंटचा वापर करावा असे नियम आहे. परंतु काम करणारे ठेकेदार दुकानातील सिमेंट (४३ ग्रेडचा) सर्रास विहिरीच्या कामाला वापरताना दिसत आहेत. त्यामुळे, खोरनिनको गावातील जलजीवन मिशन कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.