
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नव्या संसद भवनाची गरज आहे का?, असा प्रश्न देशाच्या संविधानिक संस्था व पदाविरुद्ध रोज सकाळी गरळ ओकणारे संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बीएमसीच्या पैशाने नवी मातोश्री, मातोश्री – २ बांधली. त्याची गरज होती का?, जुन्या मातोश्रीत ते का नाही राहत?, याचे उत्तर प्रथम त्यांनी द्यावे आणि नंतर नव्या संसद भवनाबद्दल प्रश्न विचारावे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
देशाला कायम अस्थिर ठेवायचा प्रयत्न जसा शहरी नक्षली करतात त्याच दिशेने संजय राऊत यांचा प्रवास सुरू आहे. येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण होत आहे. त्यावर संजय राऊत हे टीका करत आहेत. सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष असताना तेव्हाच्या एनडीएने, ज्यामध्ये उद्धव ठाकरेही होते, एकमताने ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा सर्व देशांत मोदींना जो मान मिळतोय ते यांना बघवत नाही. त्यामुळे राऊत अशी टीका करत आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. पण, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधू शकले नाहीत. आज मोदी देशाला बहुमान मिळवून देतात तर यांना मिरच्या झोंबतात, असेही ते म्हणाले. आज राऊत यांनी सामना या मुखपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बाजूने अग्रलेख लिहिला आहे. यांनी अजित पवार यांच्या बाजूने कधी अग्रलेख लिहिला नाही. उलट, भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यासाठी ते बॅगा भरून तयार आहेत, असे त्यांनी लिहिले. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये काड्या घालण्याचा हा प्रयत्न आहे. आजित पवार कधी राष्ट्रवादी सोडतात आणि आपण तेथे घुसतो, असा यांचा प्रयत्न आहे, असे नितेश राणे म्हणाले.