
पुणे: संजय राऊत जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा राज्यात शांतता जाणवत होती. संजय राऊत तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. आता उन्हाळा सुरू आहे. म्हणून त्यांना परत सरकारी विश्रांतीची गरज आहे असे मला वाटत आहे. त्यामुळे आमच्या समर्थकांच्या भावना दुखवतील अशी विधाने तुम्ही करू नका, असा इशारा शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांना दिला.
आजच्या सामनाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून भाष्य करण्यात आले आहे. त्यावर शंभुराज देसाई यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामनाच्या अग्रलेखाला एक दर्जा होता. मात्र संजय राऊत जेव्हापासून लिहायला लागलेत तेव्हापासून तो दर्जा राहिला नाही. मी आजचा अग्रलेख वाचला नाही. संजय राऊत आता जयंत पाटलाचे प्रवक्ते झाले आहेत. भाकरी ठाकरेंची खातात, मात्र चाकरी शरद पवारांची करतात. ते विश्वप्रवक्ते झाले आहेत. जयंत पाटील कधीही माझ्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव आल्याबद्दल बोलले नाहीत. मग संजय राऊतांना ते स्वप्न पडले होते का? असा सवालच शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला आहे.