Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणधोकादायक प्रवास

धोकादायक प्रवास

जेट्टीवरील संरक्षक कठडे तुटले; स्टेशन मार्गही बंद

उरण (प्रतिनिधी) : उरण ते मुंबई हा जलप्रवास जरी प्रवाशांसाठी सोयीचा मार्ग असला तरी मोरा बंदरावर ये-जा करण्यासाठी असलेल्या जेट्टीच्या दुरवस्थेमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या जेट्टीवरील संरक्षक कठडे अनेक ठिकाणी तुटले असून वीज ही नसल्यामुळे रात्रीचा प्रवास करणे हे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. याशिवाय बंदरावरून प्रवास करणार्या प्रवाशांच्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था नसल्याने अर्धा किलोमीटरपेक्षा अधिकचे अंतर असलेल्या या जेट्टीवर अनेक अडथळ्यांचा प्रवास हजारो प्रवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे सुखकर जलवाहतुकीचे मोरा आता समस्यांचे बंदर बनले आहे.

मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान अर्धा ते पाऊण तासांचे अंतर असलेला जलमार्ग आहे. या जलमार्गावरून प्रवास करण्यासाठी ‘महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डा’कडून मोरा जेट्टी बांधण्यात आली आहे. या जेट्टीची दुरवस्था झाली असून समुद्रात असलेल्या या जेट्टीच्या मार्गावरील ये-जा करण्यासाठी असलेले संरक्षक लोखंडी पाइप, असलेले कठडे तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे बंदरावर जात असताना येणाऱ्यावादळी वाऱ्यांमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. शिवाय रात्रीच्या वेळी जेट्टीवरील विजेची सोय विस्कळीत असल्याने बहुतांश वेळा दिव्याखाली अंधारच असतो. त्याचबरोबर या जेट्टीवर मासळी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे दुरुस्तीचे कामदेखील सुरू असल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना होतो.

तसेच बंदर विभागाने या ठिकाणी वाहनांना बंदी घातली असूनदेखील जेट्टीवरच दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने हे बंदर अनेक असुविधांनी ग्रासलेले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -