पुणे : आम्ही भाकरी फिरवत नाही गरिबांच्या भाकरीची चिंता करतो. सध्या सगळीकडे भाकरी फिरवण्याची चर्चा आहे. त्यातील एक पक्ष भाकरी फिरवतात दुसरा भाकरीचे तुकडे करतात आणि तिसरा पक्ष पूर्ण भाकरी हिसकावून घेतो. फक्त भाजपच गरिबांच्या भाकरीची चिंता करते, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले, उसने बळ घेऊन वाघ बनता येत नाही. त्यासाठी स्वतःची ताकद लागते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तरी त्यांना जाग येईल असे वाटले होते. तसे झालेले नाही उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही मागण्या न्यायालयाने मान्य केल्या नाहीत. तरी म्हणतात गावोगाव निकाल सांगू. बडवा! आमच्या बापाचे काय जाते! सरकार पूर्ण घटनात्मक आहे. कार्यकाळ तर पूर्ण करेलच, शिवाय पून्हा निवडून येईल.
ठाकरे यांच्याबरोबरच फडणवीस यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले. टीआरपी कसा खेचावा यासाठी त्यांचा क्लास लावावा. स्वतःच्या पक्षाचा स्वतःच राजीनामा दिला. ‘लोक माझे सांगाती’ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे काय होते ते सांगितले आहे. हेच सगळे आरोप आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना करत होतो. त्यामुळे पवारांनीच हे लिहिल्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो म्हणत फडणवीसांनी पवारांना आणि उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. नाना पटोले यांना अवॉर्ड द्यायला हवे. ते म्हणतात वाझेला मीच स्फोटके ठेवायला सांगितले. वाझेंना पोलीस सेवेत घेण्यासाठी ठाकरेच सर्वाधिक आग्रही होते.
‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात काय लिहिलं आहे?
१. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरे यांच्या संवादात नव्हती.
२. उद्धव ठाकरे यांना राज्यातील घडामोडींची माहिती नसायची जी मुख्यमंत्र्यांना असायला हवी.
३. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यावर शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पना आम्हाला नव्हती.
४. कधी, कुठे, काय घडेल याचा अंदाज घेण्याची क्षमता उद्धव ठाकरेंकडे नव्हती.
५. घडामोडींनुसार कोणती पावलं उचलायची या राजकीय चातुर्यांची कमतरता जाणवत होती.
६. राज्यात सगळं घडत होतं हे त्यांना टाळता आलं नाही आणि मविआ सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली होती.
७. उद्धव ठाकरे ऑनलाईन प्रशासनाच्या संपर्कात होते मात्र अजित पवार आणि राजेश टोपे हे ग्राऊंडवर उतरुन काम करत होते.
८. उद्धव ठाकरेंचं दोन वेळाच मंत्रालयात जाणं पचनी पडणारं नव्हतं.